मुंबई – नव्या कामगार कायद्याचा कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याचे दिसत आहे. कारण त्याच्यातील अनेक गोष्टी या कर्मचाऱ्यांसाठी सकारात्मक ठरणार आहेत. यात कर्मचाऱ्यांना आठवड्यातून ३ दिवस सुट्टी मिळण्याची शक्यता आहे. कामगार आणि रोजगार मंत्रालयाने चार नवीन कामगार कायद्याची अंमलबजावणी करण्याबाबत त्याच्याशी संबंधित नियमांना या आठवड्यात अंतिम स्वरूप प्राप्त करून देणार आहे. हे कायदे अंमलात आल्यानंतर देशात कामगार धोरणांमध्ये नवीन प्रणालीला सुरुवात होणार आहे.
ही बातमी चर्चेत असतांनाच कर्मचाऱ्यांबाबत पुन्हा एक बातमी चर्चेत आली आहे. आता ऑफिस वेळेत साजश्रुंगार करणे कर्मचाऱ्यांना पडू शकते महागात. कर्मचाऱ्यांच्या कार्यालयातील वागणुकीबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने कर्मचाऱ्यांनी कामाच्या वेळी केस विंचरायला जाणं ( साजश्रुंगार ) हा गंभीर गैरवर्तनाचा प्रकार असल्याचं म्हटलं आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असं की, १९९५ साली एका गिरणीत कामाच्या दिवशी वरिष्ठ अधिकारी पहाणी करण्यासाठी गेले असता कामगार रंगाराव हे स्वत:च्या मशीनवर नव्हते. ते दुसरीकडे जाऊन केस विंचरत होते. यावेळी कामगार रंगाराव याना कामास सुरुवात करावी असं वरिष्ठ अधिऱ्याने सांगितल्यानंतर तो कामगार संतापला त्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांना धक्काबुक्की केली. यानंतर कंपनीने रंगाराव यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.
तसेच कंपनीने अंतर्गत समिती बसवून घडलेल्या प्रकरणाचा तपास केल्यानंतर रंगाराव दोषी आढळल्याने त्यांना कामावरुन काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयावर रंगाराव यांनी यावर आपलं मत मांडत याचिका उच्च न्यायालयामध्ये दाखल आहे. मात्र उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने कर्मचाऱ्यांनी कामाच्या वेळी केस विंचरायला जाणं ( साजश्रुंगार ) हा गंभीर गैरवर्तनाचा प्रकार असल्याचं म्हटलं आहे.