पिंपरी – अदानी कंपनीच्या अतिउच्चदाब 400 केव्ही शिक्रापूर ते तळेगावच्या एका वीजवाहिनीमध्ये शनिवारी (दि. 11) पहाटे चारच्या सुमारास अचानक तांत्रिक बिघाड झाला. सुमारे 209 मेगावॅट विजेची तूट निर्माण झाली होती. त्यामुळे महापारेषण व महावितरणच्या उपकेंद्रांमधून भारव्यवस्थापन शक्य नसल्याने आज सकाळी 7.14 ते सकाळी 8.45 वाजेपर्यंत पिंपरी चिंचवड शहरातील काही भागात मावळचा काही परिसरात विजेचे भारनियमन करावे लागले. त्याचा फटका सुमारे 2 लाख 19 हजार ग्राहकांना बसला.
अदानी कंपनीच्या अतिउच्चदाब 400 केव्ही वीजवाहिनीमध्ये बिघाड झाल्यामुळे भारव्यवस्थापनासाठी एलटीएस (लोड ट्रीमिंक स्किम) यंत्रणा कार्यान्वित झाली. सुमारे 209 मेगावॅटची तूट भरून काढण्यासाठी महापारेषणचे 132 केव्ही रहाटणी, 220 केव्ही चिंचवड, 220 केव्ही थेऊर आणि 220 केव्ही उर्से अतिउच्चदाब उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद करण्यात आला. परिणामी महावितरणच्या उपकेंद्रांना देखील वीजपुरवठा बंद झाला.
त्यामुळे पिंपरी, चिंचवड, पिंपळे सौदागर, काळेवाडी, थेरगाव, वाकड, निगडी, प्राधिकरण, किवळे, मावळमधील काही भाग, उरुळी कांचन शहरासह सुमारे 2 लाख 19 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सकाळी दीड तास बंद ठेवावा लागला, असे महावितरणे कळविले आहे.