मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे. करोना काळात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांच्या दौऱ्यानंतर आढळलेली वस्तूस्थिती आणि त्यावरील उपाययोजनांबाबतचे हे पत्र आहे. आम्ही शक्य ती सर्व मदत तुम्हाला करतो आहे. मात्र आता परिस्थिती गंभीर होत चालली आहे. या कठीण काळात आवश्यकता वाटत असल्यास चर्चेला तयार आहोत, असेही फडणवीसांनी यात म्हटलं आहे.
मुंबईतील केईएम, नायर आणि सेंट जॉर्ज रूग्णालय, पुणे आणि पिंपरी चिंचवड, सोलापूर, अमरावती आणि अकोला, नागपूर, एमएमआर क्षेत्रातील पनवेल, नवी मुंबई, उल्हासनगर, भिवंडी, कल्याण, ठाणे आणि मिरा भाईंदर तसेच नाशिक, मालेगाव, जळगाव आणि औरंगाबाद इत्यादी ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी दौरा केला होता. या दौऱ्यानंतर तपशीलवारपणे त्यांनी पत्र लिहिले आहे.
रुग्णालयाबाहेर झालेले 600 मृत्यू अद्याप मुंबई महापालिकेने जाहीर केलेले नाहीत. त्यासंबंधीच्या आकडेवारीची तत्काळ पडताळणी करून ती संख्या जाहीर करण्यात यावी तसेच 10 जुलै 2020 रोजीच्या प्रसिद्धीपत्रकात मुंबईतील 275 मृत्यू हे अन्य कारणांमुळे झाले, असे दर्शविण्यात आले आहेत.
आयसीएमआरने कोणते मृत्यू कोरोनामृत्यू समजावे आणि कोणते नाही, यासंदर्भात अतिशय स्पष्ट दिशानिर्देश दिले आहेत. असे असताना ते अन्य कारणांमुळे झाले असे दाखविणे योग्य नाही. ते कोरोनाबळींच्या संख्येत दाखवण्यात यावेत, या प्रमुख मागण्या फ़डणवीसांनी केल्या आहेत.
देवेंद्र फडणवीसांच्या काही प्रमुख मागण्या
संपूर्ण राज्यात रुग्णसंख्या अतिशय झपाट्याने वाढत आहे. त्याचा नीट अंदाज लावून येणाऱ्या काळासाठी आजच पुरेशा प्रमाणात बेड्स आणि ऑक्सिजन, व्हेंटीलेटरची सुविधा असणारे बेडस् उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. महापालिका, नगरपालिकांच्या वर्गानुसार, तेथे पुरेशा प्रमाणात व्हेंटिलेटर राज्य शासनामार्फत तातडीने उपलब्ध करुन द्यावेत.