मुंबई – देशात केंद्रीय यंत्रणांच्या होत असलेल्या गैरवापराबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर काही केल्या थांबत नाही. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाच्या नेत्यांच्या विरोधात कारवाया सुरु झाल्या आहेत. महाराष्ट्रात मागील सात वर्षांपासून देवेंद्र फडणवीसजी हे केंद्रीय यंत्रणांना निर्देश देत आहेत.
शरद पवार यांना देखील नोटीस पाठविण्यात आली. आता माझ्या बाबतीत ते यंत्रणांच्या मागे लागले आहेत. माझे एकच म्हणणे आहे, फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी ओएसडी नेमले होते. आता केंद्रीय एजन्सीचे ते स्वतः ओएसडी झाले पाहीजे. तसेच किरीट सोमय्या यांना यंत्रणेचे प्रवक्ते केले पाहीजे, अशी टीका मलिक यांनी केली.
नवाब मलिक पुढे म्हणाले की, “माझ्या विरोधात कट-कारस्थान रचले तरी मी कुणाला घाबरणार नाही. भाजपच्या माध्यमातून राज्यात गैरप्रकार झालेले आहेत. यंत्रणेचा दुरुपयोग होत असेल, भ्रष्टाचार होत असेल तो जनतेच्या समोर आणण्याचे काम मी करत राहीन. किरीट सोमय्या आम्हाला बोलतात, अलीबाबा चाळीस चोर, पण मी सांगू इच्छितो की, भाजप ही चोरांची वरात आहे आणि किरीस सोमय्या बँड बाजेवाले आहेत.”
भाजपने कितीही यंत्रणेचा वापर केला तरी हे सरकार पडू शकत नाही. पाच वर्षांनंतर हेच सरकार पुन्हा निवडून येईल, असा विश्वास मलिक यांनी व्यक्त केला. हिंमत असेल तर आम्ही राजीनामा द्यावा, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाहजी म्हणत आहेत. पण आम्ही सांगतो, “पहले आप”. कारण लोकसभेची निवडणूक आधी झाली आहे. त्यामुळे आधी त्यांनी राजीनामा देऊन लोकसभेची निवडणूक घ्यावी मग सहा महिन्यांनंतर आम्ही विधानसभेची निवडणूक घेऊ, असे आव्हान नवाब मलिक यांनी दिले.