आयटी आणि बीपीसंदर्भात सरकारचा निर्णय
नवी दिल्ली – करोना व्हायरसचा संसर्ग होऊ नये, यासाठी सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची गरज आहे. त्यामुळे सध्या माहिती तंत्रज्ञान आणि बीपीओ क्षेत्रातील 85 टक्के कर्मचारी घरातून काम करतात. तशी परवानगी सरकारने दिलेली आहे. आता या वर्क फ्रॉर्म होम या पद्धतीला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
याअगोदर ही मुदत 31 जुलै रोजी संपत होती. माहिती तंत्रज्ञान उद्योगाने या निर्णयाचे या उद्योगाने स्वागत केले. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राने करोनाच्या काळातही घरातून काम करून चांगले ताळेबंद जाहीर केले आहेत. मार्च महिन्यामध्ये या क्षेत्राला 30 एप्रिलपर्यंत वर्क फ्रॉम होम करण्यासाठी परवानगी देण्यात आली. त्यानंतर यात 31 जुलैपर्यंत वाढ करण्यात आली. आता पुन्हा 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
कनेक्टिव्हिटी नियमात शिथिलता
माहिती तंत्रज्ञान आणि बीपी उद्योगाला घरातून काम करता यावे म्हणून दूरसंचार विभागाने कनेक्टिव्हिटी नियमात शिथिलता कायम ठेवली आहे. त्यामुळे या उद्योगाचे काम आगामी काळातही चालू राहील. त्याचबरोबर या उद्योगाला छोट्या शहरातून काम करण्याची शक्यता वाढली आहे. मोठ्या शहरांमध्ये प्रत्यक्ष जागेवर काम करण्याऐवजी कुठल्याही भागातून काम करता येऊ शकते. त्यामुळे छोट्या शहरातील तरुणही आता हे काम करू लागले आहेत. याचा रोजगाराच्या विकेंद्रीकरणासाठी उपयोग होत असल्याचे दूरसंचार विभागाने म्हटले आहे.