मुंबई – राज्यात विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. निवडणुकांदरम्यान राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. गेल्या चार दिवसांपासून नाशिक मतदारसंघ चर्चेत होता. काॅंग्रेसने डाॅ. सुधीर तांबे यांना अधिकृत उमेदवारी दिली असता ऐनवेळी त्यांनी अर्ज न भरता त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. त्यामुळे पक्षाने सुधीर तांबे यांना पक्षातून निलंबित केले आहे. त्यानंतर आता मराठवाडा शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादी पक्षात बंडखोरी झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रदीप सोळुंके यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवत बंडखोरी केली आहे. त्यामुळे पक्षाने कारवाई करत त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. राष्ट्रवादीचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी पत्र काढले आहे. ज्यात सोळुंके यांची तात्काळ हकालपट्टी करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाने विक्रम काळे यांना अधिकृत उमेदवारी दिली होती. मात्र, याचवेळी राष्ट्रवादीचे प्रदीप सोळुंके यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल करत बंडखोरी केली होती. अर्ज मागे घेण्याच्या सूचना त्यांना पक्षाकडून देण्यात आल्या होत्या. मात्र, तरीही सोळुंके यांनी आपण निवडणूक लढवणारच अशी भूमिका जाहीर केली. त्यामुळे अखेर सोळुंके यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघात विक्रम वसंतराव काळे यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीकडून अधिकृतरीत्या उमेदवारी देऊन “AA ” व “BB” फॉर्म देण्यात आले आहेत. तसेच ते महाविकास आघाडीचेही उमेदवार आहेत. मात्र असे असतांना प्रदीप सोळुंके यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरुध्द अर्ज भरला होता. आज शेवटच्या दिवशी सोळुंके यांना कळवूनही त्यांनी अर्ज मागे न घेता पक्षशिस्तीचा भंग केलेला आहे. त्यामुळे त्यांची पक्षातून तात्काळ हकालपट्टी करण्यात येत असल्याची माहिती गर्जे यांनी दिली आहे.
दरम्यान, औरंगाबाद मतदारसंघातून 14 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. डॉ.गणेश वीरभद्र शेटकर (अपक्ष) या एका उमेदवाराने शिक्षक मतदार संघ निवडणुकीतून माघार घेतली आहे. तर सद्या काळे विक्रम वसंतराव (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी),प्रा.पाटील किरण नारायणराव (भारतीय जनता पार्टी), माने कालीदास शामराव (वंचित बहुजन आघाडी), अनिकेत भीमराव वाघचवरे पाटील (अपक्ष), प्रा. अश्विनकुमार पुरभाजी क्षीरसागर (के.सागर) (अपक्ष), आशिष (आण्णा) आशोक देशमुख (अपक्ष), कादरी शाहेद अब्दुल गफुर (अपक्ष), नितीन रामराव कुलकर्णी (अपक्ष), प्रदीप दादा सोळुंके (अपक्ष), मनोज शिवाजीराव पाटील (अपक्ष), विशाल (विक्की) उद्धव नांदरकर (अपक्ष), सुर्यकांत संग्राम विश्वासराव (अपक्ष), संजय विठ्ठलराव तायडे (अपक्ष), ज्ञानोबा चिमनाजी डुकरे (अपक्ष) असे एकूण 14 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.