टाकवे, दि. 16 – लोणावळा, खंडाळा ही थंड हवेची ठिकाणे म्हणून ओळखली जातात. उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा या तिन्ही ऋतू मध्ये याठिकाणी पर्यटक येत असतात. त्यासोबतच ग्रामीण भागामध्येही हुरडा पार्टी, पोपटी पार्टीचे आयोजन होऊ लागले आहे. काही दिवसांपासून मावळ तालुक्यातील पारा चांगलाच घसरला आहे. त्यामुळे अशा इव्हेंटच्या पाट्यांना वेग येऊ आला आहे. मुंबई, पुण्यासह राज्याच्या विविध भागातून या ठिकाणी पर्यटक येऊ लागले आहेत. शेकोटी करून रात्रभर करमणूकीचे कार्यक्रम आणि गप्पांचा फड रंगत आहे.
पहाटेचे धुके, कडाक्याच्या थंडीमुळे शहरे, गावे गारठू लागली आहे. गावागावांत ऊब मिळवण्यासाठी शेकोटी पेटविली जात आहे. घराजवळ, नाक्यानाक्यावर, चौकाचौकांत शेकोट्या पेटू लागल्या असून गप्पांचे फड रंगू लागले आहेत. मात्र या शेकोटीला आता इव्हेंटचे स्वरूप आले आहे. त्यातून पर्यटकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
थंडीत शेकोटी पेटत नाही, असे गाव विरळच. ग्रामीण भागामध्ये शेकोटीचे अस्तित्व आजही टिकून आहे. याच शेकोटीभोवती गावातील अनेक ज्येष्ठ, तरुण मंडळी एकत्र येतात. पालापाचोळा, लाकडे एकत्र करून शेकोटी पेटवली जाते. शेवटचा निखारा विझेपर्यंत गप्पा रंगतात. ग्रामीण भागात थंडीपासून बचाव करण्यासाठी पेटविण्यात येणाऱ्या शेकोटीभवती राजकारणावर चर्चा, क्रिकेट-फुटबॉलवर पैजा, भुताखेतांच्या गप्पा, कुसत्यांचा फड यावर चर्चा होताना दिसते. शेकोटी पेटली की, जुन्या आठवणींबरोबरच पिढ्यान पिढ्यांच्या प्रवासालाही उजाळा मिळतो. ज्या काळामध्ये उबदार कपड्यांचा शोध लागला नव्हता तेव्हापासून शेकोटी मायेची ऊब देण्याचे काम करीत आहे.याच शेकोटीच्या ठिकाणाहून ज्येष्ठांकडून तरुण पिढीला अनुभवांची देवाणघेवाण होते.
शेकोटीला इव्हेंटचे स्वरूप
महाविद्यालयीन सहली असो, कॅम्प असो शेकाटे पेटवण्याचे अर्थात फायर कॅम्पचे नियोजन आवर्जून केले जाते. ग्रामीण भागात शेकोटीच्या साक्षीने पोपटी पार्ट्याही रंगू लागल्या आहेत. थंडीत अनेक फार्म हाऊसमध्ये शेकोटीसाठी कणीस अथवा हुरडा पार्टी आयोजित केली जात आहे. काही जण तर खास कुटुंबासाठी शेकोटी पार्टी करतात.ग्रुपने ट्रेकिंगला जाणारे अनेक जण फायर कॅम्पचे आयोजन करतात. नदी किंवा धरणाच्या शेजारी तंबू टाकून अशा पार्ट्या आयोजित केल्या जात आहे.