मुंबई : काँग्रेस नेते आशिष देशमुख यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. शिस्तपालन समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण यांनी याबाबत आदेश दिले आहेत. आशिष देशमुख यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधातील वक्तव्य केले होते.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या शिस्तपालन समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण यांनी याविषयी माहिती दिली. “महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या शिस्तपालन समितीने ५ मार्च २०२३ रोजीच्या पाठविलेल्या कारणे दाखवा नोटीसला ९ एप्रिल २०२३ रोजीच्या आपल्यामार्फत मिळालेल्या उत्तरावर समितीने चर्चा केली आहे. आपण आपल्या पक्षविरोधी वर्तनाबद्दल आणि जाहीर वक्तव्याबद्दल दिलेले उत्तर समितीला समाधानकारक वाटत नाही. त्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या घटनेतील शिस्तपालन नियम आणि मार्गदर्शक तत्वे या प्रकरणात लागू होतात.”असे चव्हाण यांनी यावेळी म्हटले.
“आपण केलेल्या पक्षविरोधी वक्तव्याची दखल घेऊन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या शिस्तपालन समितीने तुम्हाला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वातून सहा वर्षांच्या कालावधीसाठी निष्कासन करण्याचा निर्णय घेतला आहे”, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी निर्णय देताना म्हटले.
तसेच पुढे बोलताना त्यांनी, “या आदेशाद्वारे पक्षविरोधी कारवायांमुळे आपल्याला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वावरुन पुढील सहा वर्षाकरिता तात्काळ निष्कासित करण्यात येत आहे,” असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी नमूद केले.