नवी दिल्ली – संसदेच्या नवीन भवनाचे उद्घाटन राजशिष्टाचारानुसार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्तेच व्हायला हवे अशी मागणी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्यावतीने करण्यात आली आहे. या पक्षाच्या राज्यसभा सदस्य प्रियंका चर्तुर्वेदी यांनी ही मागणी केली.
त्यांनी भाजपवर संवैधानिक अनैतिकतेचा आणि ते “सत्तेने आंधळे”झाल्याचा आरोप केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, राष्ट्रपती हे संसदीय मंडळाचे प्रमुख आहेत, त्यांचे स्थान सरकारच्या प्रमुखाच्या म्हणजे भारताच्या पंतप्रधानांच्या वरचे आहे. नवीन संसदेचे उद्घाटन प्रोटोकॉलच्या गरजेनुसार राष्ट्रपतींनीच केले पाहिजे असे त्यांनी नमूद केले.
कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सर्वात आधी हीं मागणी केली होती. त्या मागणीला आता व्यापक पाठिंबा मिळताना दिसत आहे. अन्य राजकीय पक्षही आता हीच मागणी करू लागले आहेत. या संबंधात ठाकरे गटाची भूमिका त्यांच्या राज्यसभेच्या सदस्य प्रियंका चतुर्वेदी यांनी आज प्रथमच जाहीरपणे मांडली.