– इंदापूर तालुक्यातील शेतकरी हताश ः महामारीचाही बसला फटका
अमोल रजपूत
वालचंदनगर – इंदापूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी डाळींब पिकाचे भरघोस उत्पादन घेतले. मात्र करोना महामारी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे या शेतकऱ्यांच्या निर्यातक्षम डाळिंबाला कवडीमोल बाजारभाव मिळाला आहे. लॉकडाऊन आणि नैसर्गिक आपत्तीमुळे डाळिंबाला अपेक्षित बाजारभाव मिळाला नाही. त्यामुळे निर्यातक्षम उत्पादन काढूनही अपेक्षित बाजारभाव नसल्याने शेतकरी हताश झाला आहे.
इंदापूर तालुक्यातील शेळगाव, कळंब, अंथुर्णे, लासुर्णे, निमसाखर व वालचंदनगर परिसरात मोठ्या प्रमाणात शेतकरी केळी, डाळींब, द्राक्षे पिकांचे उत्पादन घेतात.
लॉकडाऊन काळातही या भागातील केळी, द्राक्षे, कलिंगड, डाळींब उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. हाता तोंडाशी आलेली पीके बाजार उपलब्ध नसल्याने शेतात गाडण्याची वेळ येथील शेतकऱ्यांवर आली होती. तालुक्यातील शेतकऱ्यांनी यंदा कोणी दुसरा तर कोणी तिसरा बहर धरला होता. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी आर्थिक फायदा होईल यासाठी मोठा खर्च करत औषध फवारणी करून भरघोस उत्पादन घेतले. अगदी परराज्यात एक्स्पोर्ट करावे असे निर्यातक्षम उत्पादन काढले आहे. मात्र करोनाचा प्रादुर्भाव अन् लॉकडाऊन वाढल्यामुळे सगळीकडे क्षेत्रीय बंधने आली आहेत. वाढत्या लॉकडाऊनमुळे आणि गेल्या तीन चार महिन्यांपासून पावसाळी वातावरण तयार होत आहे. त्यामुळे पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला होता. ही नैसर्गिक आपत्ती आल्यामुळे डाळिंबाचे वजन म्हणावे इतके वाढले नाही. त्यामुळे डाळिंबाला प्रतिकिलो 90 ते 100 रुपये दर अपेक्षित होता. परंतू सध्या फक्त 45 रुपये कवडीमोल दराने डाळिंब विक्री झाले.
या भागातील काही शेतकऱ्यांनी पहिल्या बहरात 15 टन तर कोणी 20 टन उत्पादन घेतले. दुसऱ्याही बहरात शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले. मात्र करोनाचा फटका बसल्याने डाळिंब उत्पादन चांगले निघूनही अपेक्षित बाजारभाव न मिळाल्याने शेतकरी वर्गात नाराजीचा सूर उमटत आहे. यासाठी सरकारने लक्ष घालून हमाभाव देण्याची गरज आहे. यामुळे शेतकऱ्यांवर आलेले महामारीचे संकट दूर होऊन आर्थिक फायदा होईल.
3 एकर क्षेत्रात डाळींब पिकाचे तब्बल 15 टन उत्पादन निघाले आहे. परंतू करोनामुळे डाळिंबाला अपेक्षित बाजारभाव मिळाला नाही. या महामारीमुळे आर्थिक उत्पन्नावर पाणी फिरले आहे. यामुळे तालुक्यातील डाळींब उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यासाठी सरकारने हमीभाव देण्याची गरज आहे. शेतकऱ्यांवर नेहमीच एका पाठोपाठ संकट कोसळत आहेत. कधी महामारी, कधी लॉकडाऊन तर कधी नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.
– कुमार नामदेव गायकवाड, डाळींब उत्पादक, वालचंदनगर.