सातारा – करोनाचा फैलाव वाढू नये यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी नागरिकांनी चेहऱ्यावर मास्क न लावल्यास दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्ह्यातील 563 ग्रामपंचायतींनी सुमारे 12 लाख 29 हजार 603 रुपयांचा दंड वसूल केला आहे.
कोरेगाव तालुक्यात 81 ग्रामपंचायतींनी दोन लाख 66 हजार 910 हा सर्वाधिक दंड वसूल केला असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत व उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांनी दिली.
करोनाचा फैलाव संसर्गातून, शिंकण्यातून होत असल्याने जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी वावरताना चेहऱ्यावर मास्क वापरण्याचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले होते. मास्क न वापरणाऱ्यांवर संबंधित ग्रामपंचायत, नगरपालिका दंडात्मक कारवाई करणार असल्याचे आदेशात म्हटले होते. त्यानुसार या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे.
जावळी तालुक्यात 26 ग्रामपंचायतींनी 41 हजार 140 रुपये दंड, कराड तालुक्यात 33 ग्रामपंचायती एक लाख 62 हजार 450 रुपये, खंडाळा तालुक्यात 41 ग्रामपंचायती 53 हजार 303 रुपये, खटाव तालुक्यात 73 ग्रामपंचायती एक लाख 62 हजार 800 रुपये, कोरेगाव तालुक्यात 81 ग्रामपंचायती 2 लाख 66 हजार 910 रुपये, महाबळेश्वर तालुक्यात 8 ग्रामपंचायती 15 हजार 200 रुपये, माण तालुक्यात 92 ग्रामपंचायती एक लाख 53 हजार 50 रुपये, पाटण तालुक्यात 46 ग्रामपंचायती एक लाख 7 हजार 500 रुपये, फलटण तालुक्यात 46 ग्रामपंचायती एक लाख 7 हजार 500 रुपये, सातारा तालुक्यात 95 ग्रामपंचायती एक लाख 48 हजार 440 रुपये, वाई तालुक्यात 14 ग्रामपंचायती 12 हजार 950 रुपये दंड असा जिल्ह्यातील 563 ग्रामपंचायतींनी 12 लाख 29 हजार 603 रुपयांचा दंड वसूल केला आहे.
दुकानांमध्ये पाचपेक्षा अधिक व्यक्ती पहिल्यांदा आढळून आल्याने 21 हजार 500 रुपये दंड वसूल करण्यात आला. जावळी तालुका पाच हजार, कोरेगाव तालुक्यात दहा हजार, कराड तालुक्यात दीड हजार, पाटण तालुक्यात चार हजार, फलटण तालुक्यात एक हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. पाचपेक्षा अधिक व्यक्ती दुकानांमध्ये दुसऱ्यांदा आढळून आल्यास सहा हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. होम क्वारंटाइन आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांकडून 12 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर सार्वजनिक ठिकाणी थुंकणारांकडून दोन हजार 500 रुपये दंड वसूल करण्यात आल्याचे अविनाश फडतरे यांनी सांगितले.
कोरेगाव तालुका कारवाईत अव्वल
चेहऱ्यावर मास्क न वापरणाऱ्यांवर कारवायाच्या मोहिमेत कोरेगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी क्रांती बोराटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रभावी अंमलबजावणी करुन तालुक्यातील ग्रामपंचायतींमार्फत सर्वाधिक दंड वसूल केला. कराड, माण, सातारा, खटाव या तालुक्यातही या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी झाली.
वाई, जावळी, महाबळेश्वर या तालुक्यात अत्यंत कमी प्रमाणात कारवाया झाल्या. जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतींनी करोनाला प्रतिबंध करण्यासाठी पुढाकार घेतल्याचे दिसून येत आहे.
करोना विषाणूचा प्रादुर्भाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने ग्रामपंचायत स्तरावर विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. करोनाचा प्रादुर्भाव हा संसर्गाने होत असल्याने याबाबत गावोगावी जनजागृती करण्यात येत असून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. जे नागरिक मास्क वापरत नसतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
यापुढील काळातही अशा कारवाया होणार असून नागरिकांनी मास्क वापरुन शासनाच्या सूचनांचे पालन करण्याची गरज आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन करत असलेल्या उपाययोजनांना नागरिकांनीही साथ देण्याची गरज आहे.
अविनाश फडतरे
उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. सातारा.