– शालेय शिक्षणमंत्र्यांची घोषणा
– दहावीचे दोन पेपर नियमित वेळापत्रकानुसारच
– 9 वी व 11 वीच्या परिक्षा 15 एप्रिलनंतर घेणार
मुंबई (प्रतिनिधी) – करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून महत्त्वाच्या उपाययोजना केल्या जात असतानाच आता राज्यातील महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत, अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी केली. नववी आणि अकरावीच्या परिक्षा 15 एप्रिलनंतर घेण्यात येणार असून दहावीचे दोन पेपर मात्र नियमित वेळापत्रकानुसारच होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील परीक्षांच्याबाबत आढावा घेण्यासाठी शिक्षण विभागाची बैठक घेण्यात आली. त्यानंतर विशेष पत्रकार परिषदेत वर्षा गायकवाड यांनी हा निर्णय घोषित केला. आता पहिली ते आठवीच्या सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. पहिली व आठवीच्या विद्यार्थ्यांच्या वर्षभरातील कामगिरीचे एकत्रित मापन करून निकाल घोषित करण्यात येईल.
बारावीच्या परीक्षा 18 मार्च रोजीच संपल्या आहेत तर दहावीचे 2 पेपर बाकी आहेत. ते नियमित वेळापत्रकानुसार म्हणजेच 21 व 23 मार्चला होणार आहेत. नववी व अकरावीच्या परीक्षांबाबत 15 एप्रिलनंतर निर्णय घेण्यात येणार असल्याचेही वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
दहावीच्या परीक्षेसंबंधित आवश्यक ते शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सोडून उर्वरित सर्वांनी घरुन काम करावे. करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी बालकांनी आणि पालकांनी काळजी घ्यावी. या कालावधीत शासनातर्फे देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे असे आवाहनही प्रा. गायकवाड यांनी यावेळी केले आहे.