एकंदरीत आजची संपूर्ण परिस्थिती पाहता आपल्याला स्पष्टपणे दिसून येत आहे की कोरोना विषाणू अतिशय वेगाने पसरत आहे आणि त्या संदर्भात प्रभावी उपाय योजना शासनाद्वारे लागू केल्या आहेत. परंतु अजूनही या आजाराचे निरासान करण्यासाठी रामबाण औषध उपलब्ध नाही आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की वैयक्तिक पातळीवर आपण जाणकारांनी दिलेल्या सूचना काटेकोरपणे पाळाव्यात. जसे की वारंवार हात धुणे, गर्दीच्या ठिकाणी न जाणे ,मास्क चा वापर करणे इत्यादी.
आजच्या इंटरनेट युगात माहितीचा अपव्यय जाणवतो आणि एखाद्या बातमीची सत्यता काय आहे हे जाणून न घेता आपण त्यावर विश्वास ठेवतो आणि विनाकारण भीतीचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे वैद्यकीय अधिकारी ,शासकीय यंत्रणा यांच्यावर विश्वास ठेवून आपण स्वतः काळजी घेतली पाहिजे आणि सोशल मीडियाद्वारे पसरलेल्या अफवांना बळी न पडता त्यांना दुर्लक्षित केले पाहिजे. सर्व शाळांना सुट्टी असल्यामुळे मुलांमधे मात्र आनंदाचे वातावरण आहे. परंतु या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी पालकांनी विविध गोष्टी मुलांना सांगितल्या पाहिजे. जसे चित्रकलेच्या माध्यमातून व्यक्त होणे, स्वच्छता राखल्याने काय फायदे होतात आणि ते किती गरजेचे आहे , दिवसभर टीव्ही न बघता योग, ध्यान करणे,पुस्तक वाचणे आणि चांगले माहितीपट बघणे अश्या प्रकारच्या गोष्टी करून वेळेचा सदुपयोग केला जाऊ शकतो.
तसेच शासनाने आपत्ती व्यवस्थापन करताना समाजात भीती चे वातावरण निर्माण होऊ नये यासाठी खोट्या बातम्या आणि सोशल मीडियावर कोणत्या प्रकारचा मजकूर प्रसारित होतो याकडे लक्ष देण्याची गरज आहे. कोरो ना विषाणू मुळे होणारा आजार हा बरा होऊ शकतो आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूचे चे प्रमाण ही खूप कमी आहे हे लोकांना समजायला हवे आणि विनाकारण घाबरून न जाता योग्य काळजी घेऊन आपली सदसद्विवेकबुद्धी जागरूक ठेवणे हाच सर्वोत्तम उपाय आहे.
– अजय कंटूले,
कॉलेज रिपोर्टर,
डिपार्टमेंट ऑफ मीडिया स्टडीज,
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ