पुणे – इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. यावर्षी घेतल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे जाहीर करण्यात आली आहे. येत्या जूनच्या अखेरीस ही परिक्षा होणार असल्याची माहिती परीक्षा परिषदेकडून देण्यात आली आहे. याशिवाय ज्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षांचे अर्ज अजूनही भरले नाही. त्यांना सुद्धा अर्ज भरण्यासाठी अखेरची संधी देण्यात येणार असल्याचे परिक्षा परिषदेकडून सांगण्यात आले आहे.
इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतली जाणाही ही शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी महिन्यात नियोजित असते. या वर्षी सुद्धा 20 फेब्रुवारी रोजी परीक्षा घेतली जाणार होती. या दृष्टीने परीक्षा परिषदेचे डिसेंबर महिन्याचा अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली होती. मात्र, यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना शाळा बंद असल्यामुळे अर्ज भरण्यास संधी न मिळाल्याने, अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आणि त्यामुळे परीक्षेचे नियोजन कोलमडले आणि ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती.