धनंजय एकबोटे
(दरबार भरला आहे, महाराज सिंहासनावर विराजमान आहेत. चेहऱ्यावर चिंता दिसत आहे. दरबारातील नवरत्नसुद्धा चिंताग्रस्त आहेत. महाराज प्रधानजींच्या प्रतीक्षेत आहेत.)
“महाराजांचा विजय असो…’ त्रिवार मुजरा करीत प्रधानजी दरबारी दाखल होतात.
“काय खबर प्रधानजी? सापडले का? महाराज अधीर होत विचारतात.
“कोण महाराज?’
“अहो कोण काय? आपण ज्या कामासाठी गेला होता ते? सापडले का छावे?’
“महाराज, छावे सिंहाचे असतात, वाघाचे बछडे असतात’.
“मला शिकवू नका प्रधानजी, कामगिरीचे काय झाले ते सांगा’.
“महाराजांचा विजय असो… महाराज, सर्व बछडे सहीसलामत परत आलेत’.
“व्वा, म्हणजे आमच्या राज्यात रयत सुखी आहे तर…?’
“होय महाराज, शाळा कॉलेजातील मुलं तर आपल्या कारभारावर जाम खूश आहेत’.
“का प्रधानजी? का? आम्ही असे काय केले आहे?’ महाराजांचा आनंद चेहऱ्यावर दिसत आहे.
“महाराज, यंदा परीक्षा रद्द झाल्याने तरुण पिढी जाम खूश आहे बघा’.
“व्वा, म्हणजे ही मंडळी मतदार झाली की मत आपल्यालाच मिळणार’.
“तोवर लक्षात राहील का महाराज त्यांच्या?’
“प्रधानजी डोंट कम वीथ प्रॉब्लेम, कम वीथ सोल्युशन. यापुढे प्रत्येक होर्डिंग्जवर आठवण करून द्या, आमच्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली’.
“म्हणजे करून दाखवलं, हेच ना महाराज?’
“अलबत. तुम्ही समजदार आहात’.
“महाराज आणखी एक प्रॉब्लेम झाला आहे’.
“आता काय?’ महाराज चिडूनच विचारतात.
“आपले मित्र बदल्यांवरून चिडलेत बरं. सिरियसली…!’
“अरे देवा, प्रधानजी, तुमच्या लक्षात येत आहे का?’
“काय महाराज?
“यंदा विद्यार्थ्यांच्या परीक्षा जरी रद्द झालेल्या असल्या, तरी आपली मात्र दररोज परीक्षा आहे हं’.
“खरं आहे महाराज, रोज नवा पेपर, रोज नवी डोकेदुखी…
“काय कारण आहे प्रधानजी?’
“महाराज, सिलॅबस बदलला, बाकं बदलली आणि मुख्य म्हणजे बाकांवर बसणारे सवंगडी बदलले…!’ प्रधानजी गालातल्या गालात हसतात, तसे महाराजांना राग अनावर होतो व “तखलिया’ असे फर्मान सोडून शयनगृहात कूच करतात.