मुंबई : जनसेवा, राज्याची आणि देशाची सेवा ज्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग होता, अशा राज्याचे माजी मुख्यमंत्री व देशाचे माजी गृहमंत्री स्व. डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या विचारांचे मार्गदर्शन घेऊन, त्यांनी दाखवलेल्या वाटेवरून राज्याला प्रगतीपथावर नेणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केले.
माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री स्व.डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या 100 व्या जयंती दिनानिमित्त सह्याद्री अतिथीगृहात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.
डॉ. स्व. शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने राज्य शासनाच्या साहित्य संस्कृती मंडळाने निर्मिती केलेल्या “आधुनिक भगीरथ’ या गौरवग्रंथाचे तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या “लोकराज्य’ मासिकाच्या विशेषांकाचे आणि दै. सत्यप्रभाच्या विशेषकांचे प्रकाशन मुख्यमंत्री तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते आज झाले.
स्वातंत्र्याची जपणूक करताना आणि त्याचे स्वराज्यात रुपांतर करताना मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने करणारे स्व. शंकरराव चव्हाण यांचे व्यक्तिमत्व होते. सुजलाम सुफलाम राज्य निर्मितीमध्ये त्यांचे योगदान मोलाचे ठरले. त्यांनी सचिवालयाचे मंत्रालय असे नामकरण करणे असो किंवा भोंगा वाजवून वेळेत काम सुरु करण्याची कल्पना असो, त्यांचे कार्य आणि विचार नेहमीच प्रेरणादायी राहिले आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
वीज, शेती, पाटबंधारे आदी क्षेत्रात त्यांनी मोठे काम केले. त्यांच्या दूरदृष्टीतूनच राज्यात विद्युत प्रकल्प व धरणांची निर्मिती झाली. देशाच्या अनेक महत्त्वाच्या निर्णयात मोलाचा सल्ला देण्याचे काम त्यांनी केले, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
गौरव ग्रंथ व लोकराज्यचा विशेषांक संग्राह्य – अशोक चव्हाण
मंत्री अशोक चव्हाण म्हणाले, माजी गृहमंत्री तसेच मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे सर्व पक्षातील नेत्यांशी चांगले संबंध होते. माजी मुख्यमंत्री स्व. चव्हाण यांच्या जन्मशताब्दीनिमित्त राज्य शासनाने अनेक विकास कामे सुरू केली आहेत. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात स्पर्धा परीक्षा केंद्र उभारणे, भोकर येथे पोलीस प्रशिक्षण केंद्र उभारणे, जल संवर्धनात काम करणाऱ्यांसाठी जलपुरस्कार देणे आदी उपक्रम राबविले आहेत. “आधुनिक भगीरथ’ गौरव ग्रंथ आणि लोकराज्यचा विशेषांक हे वाचनीय व संग्राह्य झाले आहेत.