नवी दिल्ली : शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. त्यांनी “माजी मुख्यमंत्री हे सौजन्याची मूर्ती नाही, तर सुडाची मूर्ती आहेत, अशा शब्दांत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचं नाव न घेता टीका केली. शिवाय माजी मुख्यमंत्री यांनी स्वतः काल परवा मला बदला घ्यायचा होतं, असे स्पष्ट म्हटले होते, याची आठवणही त्यांनी यावेळी करुन दिली. सावंत यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
अरविंद सावंत यांनी यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही जोरदार निशाणा साधला. एकनाथ शिंदे यांच्या पायाखालची वाळू सरकतेय, असा टोला अरविंद सावंत यांनी लगावला. ठाण्यात झालेल्या राड्यावरुनही त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की,…माझ्या विधानसभा मतदारसंघात माझ्या विरोधात माणसं उभी राहतात, हे त्यांना (एकनाथ शिंदे यांना) झोंबलंय, म्हणून ही प्रतिक्रिया आली. ही प्रतिक्रिया मागे बोलत राहते, ‘तुम्ही बघत बसला का?’
या प्रतिक्रियेतूनच हात चालवला असल्याचा आरोप अरविंद सावंत यांनी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांवर केला. दरम्यान, या राड्यात स्थानिक लोकं नाहीत, त्यात बाहेरुन आलेली लोकं होती, असाही आरोप त्यांनी केला.
दरम्यान, रात्री उशिरा शिंदे-फडणवीस यांच्या झालेल्या बैठकीवरुनही अरविंद सावंत यांनी निशाणा साधला. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना रात्री भेटायची सवयच आहे असं ते म्हणाले. त्यांनी याआधी जे कट कारस्थान रचलं, ते तर वेशांतर करुन केलं आणि त्यावर सभागृहातही त्यांनी सांगितलं होतं, असेही अरविंद सावंत यांनी म्हटले आहे.
शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवले होते. त्याविरोधात ठाकरे गटाने दिल्ली उच्च न्यालयात धाव घेतली होती. शिंदे गट अंधेरी निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडे गेला, पण त्यांनी निवडणूक लढवलीच नाही. शिंदे गट धादांत खोटं बोलल्याचाही पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला. दरम्यान, धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे पक्षाचे नावपुन्हा मिळावं यासाठी ठाकरे गटाने दिल्ली हायकोर्टात धाव घेतली. आज या प्रकरणावर सुनावणी पार पडणार आहे.