गुवाहाटी – आसाममधील तीन जिल्ह्यांमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली, ज्यामध्ये सार्वजनिक जमिनीवरील हजारो कथित अतिक्रमणकर्त्यांना अडचणीचा सामना करावा लागला. या मोहिमेदरम्यान, अतिक्रमणकर्त्यांनी सुरक्षा दलांवर दगडफेक केली असता त्यांना पांगवण्यासाठी सुरक्षा दलांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला. काही अतिक्रमणकर्त्यांनी असा दावा केला की त्यांना निर्धारित तारखेपूर्वी त्यांच्या घरातून बाहेर काढले जात आहे.
विरोधी पक्ष असलेल्या कॉंग्रेसने अतिक्रमण हटाव मोहिमेसाठी आसामच्या भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारवर टीका केली आणि म्हटले की, अनेक प्रभावित कुटुंबांना वन हक्क कायदा, 2006 अंतर्गत जमिनीचा हक्क आहे. मध्य आसाममधील सोनितपूर जिल्ह्यातील सुमारे 1,900 हेक्टर बुराचापोरी वन्यजीव अभयारण्य आणि लगतची महसूल गावे रिकामी करण्याची कारवाई दुसऱ्या दिवशीही सुरू राहिली. या मोहिमेमुळे सुमारे 12 हजार लोक बेघर होणार आहेत.
अप्पर आसामच्या तिनसुकिया जिल्ह्यातील डिगबोई येथे अतिक्रमणकर्त्यांनी दगडफेक केल्यानंतर पोलिस आणि निमलष्करी दलांकडून लाठीचार्ज करण्यात आला. यात कोणालाही दुखापत झाली नसल्याचे डिगबोई पोलिसांनी सांगितले. नॉर्थ ईस्ट फ्रंटियर रेल्वेकडून बोगापानी ते माकुमपर्यंत विद्युतीकरणाचे काम सुरु आहे. त्यासाठी ही अतिक्रमणे हटवण्यात येत आहेत.
अतिक्रमण हटाव मोहिमेत 200 हून अधिक घरे आणि दुकाने रिकामी करण्यात येणार आहेत. गेल्या 10 वर्षांपासून हे क्षेत्र रिकामे करण्याचा प्रयत्न केला जात असूनही नागरिक सहकार्य करत नसल्याने कडक कारवाई करण्याची सूचना प्रशासनाने संबंधितांना दिली होती. यावेळी जिल्हा प्रशासनाने बारपेटा जिल्ह्यातील भवानीपूर येथे वैष्णव मठशी संलग्न असलेली सुमारे 300 हेक्टर जमीन मोकळी करण्यात आली.
अनेक दशकांपासून अतिक्रमण झालेल्या मोकळ्या जागेत चार तलाव खोदले जाणार आहेत. यातील बहुतांश जमिनींचा वापर शेतीसाठी होत असून लोक जवळपासच्या गावात राहतात. त्यामुळे क्वचितच कोणत्याही निवासी युनिट्सवर परिणाम झाला आहे.