Chhattisgarh : छत्तीसगडच्या जांजगीर चंपा जिल्ह्यात लग्नाहून परतताना कार आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात नवविवाहित दांपत्यासह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या मन सुन्न करणाऱ्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यांच्या गाडीला ट्रकने जोरदार धडक बसल्याने हा अपघात घेतला. या घटनेनंतर आरोपी ट्रकचालकालाने पळ काढला असून पोलिस त्याचा शोध घेत आहे.
बालोदा येथील शुभम सोनी आणि शिवनारायण येथे राहणारी नेहा यांचं शनिवारी रात्रीच लग्न झालं. शुभम रविवारी सकाळी वधूला घेऊन कारने घरी परतत होता. कारमध्ये वधू-वरासोबत कुटुंबातील आणखी तीन सदस्य होते. वऱ्हाडी मंडळीची कार लग्नाहून परतत असताना भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली.
ही गाडी रामगडहून अकलतराच्या दिशेने निघाली असताना हा अपघात घडला. त्यांची कार मुलमुला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पकारिया झुलन गावाजवळ समोरुन येणाऱ्या ट्रकला धडकली. यात नवरी आणि नवरदेवासह पाच जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. अपघातात नवरदेव गंभीर जखमी झाला होता, ज्याचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
पहाटे पाच वाजेच्या सुमारास पकारिया जंगलातील चंडीदेवी मंदिराजवळ समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने कारला धडक दिली. अपघात इतका भीषण होता की, कारचा चक्काचूर झाला. या अपघाताची स्थानिकांनी पोलिसांना माहिती देण्यात आली, त्यानंतर सर्वांना स्थानिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र सर्व जखमींना डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेनंतर नव्याने सुरू होणाऱ्या जोडप्याच्या संसारावर काळाने घाला घातल्याने सर्वजण हळहळ व्यक्त करत आहे.