Manoj Jarange : राज्यात सुरु असणाऱ्या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे यांनी महाराष्ट्र दौरा सुरु केला आहे. त्यात लातूर आणि धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर मनोज जरांगे आहेत. यावेळी आयोजित सभेत मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. तर कामातून गेलेला माणूस लवकरच गोळ्या सुरु कराव्यात, असे म्हणत जरांगेंनी छगन भुजबळांवर टीका केली.
लातूरमध्ये आयोजित सभेत मनोज जरांगे यांनी, मराठ्यांचा एकनाथ शिंदे साहेबांवर विश्वास आहे. जे अधिकारी जाणूनबुजून नोंदी सापडू देत नसतील ते कामापासून दूर होणार आहेत. कितीही ढोल वाजवत बसलात तरी आरक्षण मिळणार म्हणजे मिळणार. चौकाचौकात 50 हजार लोक जमत आहेत. जरा विचार करा, हा विषय गांभीर्यानं घेतला पाहिजे.असे म्हणत त्यांनी सरकारला पुन्हा एकदा इशारा दिला.
पुढे त्यांनी उपमुख्यमंत्र्यांना इशारा देत,’देवेंद्र फडणवीसांनी आताच शहाणं व्हावं नाही तर मी सगळं बाहेर काढणार. मीच घडवून आणतोय हे त्यांनी उघडपणे सांगावं. त्यांनी आधी मोठेपणा दाखवला होता. त्यांनी आता खोड्या करायला सुरुवात केली आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. फडणवीसांनी आता स्वत:च्या माणसांना बोलायला सांगितलं आहे. फडणवीसांच्या ताटात जेवणारी माणसं बरळायला लागली आहेत. कुणी कितीही जातीयवाद केला तरी ओबीसी मराठा एकत्र आहे, असे देखील म्हटले.
या सभेत छगन भुजबळांनी केलेल्या टीकेवर देखील जरांगे यांनी उत्तर दिले आहे. कामातून गेलेला माणूस असून लवकरच गोळ्या सुरु कराव्यात. शहाणा माणूस असता, तर उत्तर दिलं असतं, असं म्हणत मनोज जरांगे भुजबळांच्या टीकेला उत्तर दिले.
मनोज जरांगे-पाटील लातूर जिल्ह्यात दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. या दोन दिवसांत ते समाज बांधवांशी संवाद साधणार आहेत. काही ठिकाणी सभा तर काही ठिकाणी बैठका घेणार आहेत. दुपारी औसा तालुक्यातील किल्लारी येथे सभा होणार आहे. ही सभा झाल्यानंतर जरांगे पाटील धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहे. 11 डिसेंबर रोजी पुन्हा लातूर जिल्ह्यात मुरुड येथे त्यांची महाविद्यालयाच्या प्रांगणात सभा होणार आहे.