आ. महेश शिंदे; ग्रामपंचायत निवडणुकीत निसटत्या मतांनी पराभूत झालेल्या उमेदवारांचा सत्कार
खटाव (प्रतिनिधी) – देशात कर्करोगासारख्या दुर्धर रोगांनी थैमान घातले आहे. सर्वांनी एकत्र येऊन या आजारांशी लढा देणे आवश्यक आहे. किती तरी विषारी घटक अन्नासोबत आपल्या पोटात जात आहेत. माझ्या मतदारसंघातील प्रत्येक गाव आणि प्रत्येक घर आरोग्यदायी झाले पाहिजे. त्यासाठी संपूर्ण मतदारसंघात “विषमुक्त स्वयंपाकघर’ आणि परसबाग ही संकल्पना राबविणार आहे, असे प्रतिपादन आ. महेश शिंदे यांनी केले.
कोरेगाव-खटाव मतदारसंघाचे आमदार महेश शिंदे आणि खटाव (ता. खटाव) येथील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामपंचायत निवडणुकीत निसटत्या मतांनी पराभूत झालेल्या उमेदवारांचा नागरी सत्कार करण्यात आला. त्यावेळी आ. शिंदे बोलत होते.
जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अशोक कुदळे, राहुल पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य मधुकर पाटोळे, पोपटराव भराडे, विद्या पाटील, डॉ. प्रिया शिंदे, सरपंच नंदकुमार वायदंडे, उपसरपंच अमर देशमुख, भरत मुळे, रोहन देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. आ. शिंदे म्हणाले, विधानसभा मतदारसंघात विकासकामांचे प्लॅनिंग झाले आहे. आगामी काळात मतदारसंघातील सर्व प्रश्न मार्गी लागतील. जनतेने खूप प्रेम दिले. विश्वास दाखवला. त्यामुळे जनतेच्या पाठीशी राहणार आहे. मतदारसंघातील रस्त्यांना प्रमुख जिल्हा मार्गाचा दर्जा दिल्याने रस्त्यांची कामे दर्जेदार होणार आहेत. मी कारखानदारीसाठी आग्रही आहे. त्यातून तरुणांना रोजगार मिळेल.
अशोक कुदळे म्हणाले, आ. महेश शिंदे हे कार्यकुशल आहेत. त्यांच्या पदाचा निश्चितपणे उपयोग होईल. राहुल देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. राजेंद्र करळे यांनी प्रास्ताविक केले. शहाजी भोसले यांनी आभार मानले. कार्यक्रमास जगन्नाथ जगदाळे, प्रकाश लावंड, संजय घाडगे, मनोहर शिंदे, किसन
मोरे, अभिजित देशमुख उपस्थित होते.
आ. महेश शिंदेंनी निधी आणला
खटावला जोडणाऱ्या रस्त्यांसाठी आ. महेश शिंदेंनी पुढाकार घेऊन निधी आणला. आम्हाला केवळ दर्जेदार काम अपेक्षित आहे. इतरांनी त्याचे श्रेय घेऊ नये. तुम्ही फक्त “कमिशन’साठी काम करता. मग, तुमच्या पदाचा उपयोग काय? जिल्हा बॅंकेत एकालाही रोजगार मिळाला नाही. केवळ अडवाअडवीसाठी तुमचे पद होते का? असा सवाल जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल पाटील यांनी केला. त्यांनी विरोधकांचा थेट नामोल्लेख टाळला.