पुणे : “इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे सायबर सुरक्षा ही काळाची गरज बनली आहे. आर्थिक व्यवहारापासून ते मनोरंजनापर्यंत माणूस आज पूर्णतः सायबर विश्वावर अवलंबून आहे. पारंपारिक युद्धापेक्षा आज शत्रुराष्ट्र आणि गुन्हेगार सायबर हल्ल्याचा अधिक वापर करत आहेत. त्यामुळे देश खऱ्या अर्थाने सुरक्षित राहण्यासाठी देशातील प्रत्येक व्यक्ती सायबर साक्षर व सुशिक्षित असणे गरजेचे आहे, असे मत सायबर सुरक्षा क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले.
सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्त इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायबर सिक्युरिटीच्या वतीने सायबर सुरक्षेवरील तिसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले होते. ‘सूर्यदत्त’च्या बावधन कॅम्पसमध्ये झालेल्या या परिषदेवेळी ‘इंटरनेट विश्व, सायबर हल्ला आणि सायबर सुरक्षा’ यावर तज्ज्ञांनी विचारमंथन केले.
प्रसिद्ध संगणक तज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय बी. चोरडिया, आंतरराष्ट्रीय सायबर सुरक्षा सल्लागार ऍड. जयश्री नांगरे, चंदन चौरसिया, डॉ. नवीन चौधरी, सायबर सिक्युरिटी कॉर्पोरेशनचे डॉ. हॅरोल्ड डिकॉस्टा, सायबर कायदा अभ्यासक ऍड. राजस पिंगळे, नाझमीन अन्सारी, आर. के. पिल्लई, पिंपरी-चिंचवड सायबर क्राईम विभागाचे पोलीस उपायुक्त सागर पानमंद, ‘सकाळ’चे वरिष्ठ बातमीदार अनिल सावळे, ‘सूर्यदत्त’च्या अधिष्ठाता डॉ. प्रतीक्षा वाबळे, विभागप्रमुख डॉ. मनीषा कुंभार आदी या परिषदेमध्ये सहभागी झाले होते.
डॉ. दीपक शिकारपूर म्हणाले, “वेबसाईट हॅकिंग हा प्रकार आता जुना झाला आहे. आज कोणताही सोशल मीडिया पूर्णतः सुरक्षित नाही. त्यामुळे या विश्वामध्ये सुरक्षित राहण्यासाठी सर्वप्रथम काळजी घेणे आणि स्वतःवरच काही बंधने घालून घेणे गरजेचे आहे. या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांनाही मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध आहेत. सायबर सुरक्षा सल्लागार म्हणून आज अनेक विद्यार्थी आपले करिअर घडवत आहेत. शिक्षण संस्थांनी ‘सूर्यदत्त’प्रमाणे सायबर सुरक्षेवरील अभ्यासक्रमांची निर्मिती केली पाहिजे.”
डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “सर्वांसाठी इंटरनेट सुविधा हे भारत सरकारचे उद्दिष्ट आहे. आज जेव्हा प्रत्येकजण इंटरनेट विश्वाशी जोडला गेलेला आहे, त्यावेळी देशातील प्रत्येक जण हा सायबर हल्ल्याला बळी पडू शकतो हे सुद्धा लक्षात घेतले पाहिजे. याची जाणीव असल्यामुळे ‘सूर्यदत्त’ने देशात प्रथमच सायबर सुरक्षा आधारित अभ्यासक्रमांची आखणी केली आहे. बीएससी इन सायबर सिक्युरिटी या विषयावर पदवी देणारी ‘सूर्यदत्त’ देशातील पहिली संस्था आहे.”
ऍड. राजस पिंगळे म्हणाले, “आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे इंटरनेट वापर सहज झाला असला, तरी त्यामुळे धोकाही मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. सुशिक्षित नागरिकही सायबर हल्ल्याला बळी पडत आहेत त्यामुळे सायबर सुरक्षेच्या संदर्भात अधिक जनजागृती करणे गरजेचे आहे. केंद्र सरकारने निश्चित केलेल्या ‘सायबर फॉर ऑल’ या उद्दिष्टामध्ये सहभागी होण्यासाठी ‘सूर्यदत्त’ने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.”
आर. के. पिल्लई म्हणाले, “भविष्यात सायबर विश्वामध्ये कशाप्रकारे माणसावर हल्ला होऊ शकतो आणि त्यामुळे माणूस मुळापासून उध्वस्त होऊ शकतो याची पूर्णतः जाणीव असल्यामुळेच सूर्यदत्त इन्स्टिट्यूटने या अभ्यासक्रमाला महत्त्व दिले आहे. आज ज्या ठिकाणी संगणक आणि इंटरनेटचा वापर होतो, तेथे आपण सायबर हल्ल्याला बळी पडू शकतो. प्रत्येक व्यक्तीने सायबर सुरक्षेसंदर्भात जागरूक असावे.”
ऍड. जयश्री नांगरे म्हणाल्या, “आज मोठ्या प्रमाणावर आर्थिक देवाणघेवाण डिजिटल स्वरूपामध्ये वाढत आहे. त्यामुळे गुन्हेगारांना डिजिटल गुन्हेगारी करण्यासाठी मोठ्या संधी मिळतात. आर्थिक देवाणघेवाणीमुळे प्रत्येकजण सायबर विश्वाशी जोडला गेलेला आहे. त्यामुळे आपली फसवणूक होऊ शकते, याची जाणीव सर्वसामान्यांना असणे गरजेचे आहे. ज्येष्ठांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जनजगृती वाढवायला हवी.”
डॉ. डीकोस्टा यांनी विद्यार्थ्यांना ‘सायबर सीक्यूरीटीतील विविध करिअरच्या संधीबाबत माहिती दिली. येणा-या काळात या क्षेत्रात मोठ्या मनुष्य बळाची गरज आसल्याचे त्यांनी नमूद केले. सायबर स्टॉकिंग, सायबर कॉन्ट्राबँड, सायबर ट्रेस पासिंग, सायबर लॉन्ड्रिंग, सायबर वाँडलीसम, सायबर डीफेमेशन, सायबर टेरररिसम, सायबर पोर्नोग्राफी आणि सायबर फ्रॉड अशा सायबर गुन्हेगारीच्या प्रकारांबद्दल त्यांनी माहिती दिली.
सायबर सुरक्षा क्षेत्रातील योगदानासाठी डॉ. दीपक शिकारपूर, ऍड. राजस पिंगळे, डॉ. हॅरोल्ड डिकॉस्टा, चंदन चौरसिया, नवीनकुमार चौधरी, आर. के. पिल्लई, जयश्री नांगरे, नाझमीन अन्सारी, सागर पानमंद, अनिल सावळे यांना ‘सूर्यदत्त सायबर टेक पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. प्रा. डॉ. प्रतीक्षा वाबळे, डॉ. आरिफ शेख, प्रा. डॉ. मनीषा कुंभार यांनी परिषदेतील विविध परिसंवादांचे निवेदन केले. प्रशांत पितालिया यांनी सूत्रसंचालन केले.