मंचर (पुणे) – अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथे गेल्या आठ दिवसांत मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने गावाला पाणी पुरवठा करणारा मोरदरा पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहे; परंतु वीज पडल्याने विहिरीजवळचा ट्रान्सफॉर्मर जळाला, त्यामुळे ऐन पावसाळ्यात नळाला पाणी न आल्याने गावातील महिलांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत असल्याने त्यांनी संताप व्यक्त केला आहे. पावसाचे पडणारे पाणी बॅरलमध्ये भरून नागरिक आपली पाण्याची गरज भागवत आहेत.
अवसरी खुर्द गावाला पाणी पुरवठा सुरळीत व्हावा म्हणून गेल्या 10 वर्षात दोन कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करण्यात आला आहे; परंतु वारंवार पाइपलाइन गळणे, विद्युत मोटारी जळणे, पाण्याच्या अनियमित वेळा, टाकीतून पाण्याची गळती होणे, विद्युत पुरवठा खंडित होणे इत्यादी वारंवार होणाऱ्या त्रासामुळे गावातील रहिवासी वैतागले आहेत. ग्रामपंचायतीमध्ये प्रशासकाची नेमणूक केल्याने प्रशासकीय अधिकारी कधी येतात, याची माहिती होतत नसल्याने नेमकी तक्रार कोणाकडे करायची असा प्रश्न ग्रामस्थांना पडत आहे. याबाबत ग्रामविकास अधिकारी आर. टी. गाढवे यांच्याशी भ्रमणध्वनिद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; परंतु संपर्क होऊ शकला नाही.
दहा वर्षांपासून दिवसाआड पाणीपुरवठा
अवसरी खुर्द गावास 2 ते 3 लाख लीटर पाण्याची गरज असताना देखील गेल्या दहा वर्षापासून दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. ठेकेदार निकृष्ट दर्जाचे काम करीत असल्याने पाइपलाइन आणि पाण्याची टाकी गळणे हे प्रकार अद्यापही चालू असल्याने गावचा पाणी पुरवठा नेहमीच विस्कळीत होत असतो.
पाच दिवसांपूर्वी विजेच्या कडकडटासह पाऊस झाल्याने गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या विहीरीचा ट्रान्सफॉर्मर जळाला. तो दुरुस्त करण्यात आला; पण पुन्हा गुरुवारी (दि. 10) झालेल्या पावसाने तो नादुरुस्त झाला. ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीचे काम सुरू आहे.
– एम. एस. आवरे, कनिष्ठ अभियंता, विद्युत वितरण, अवसरी खुर्द