मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या अटकेनंतर राष्ट्रवादीच्या गोटात संतापाचे वातावरण असून केंद्र सरकार आणि भारतीय जनता पक्षाला लक्ष्य करणारी विधाने या पक्षाच्या नेत्यांकडून केली जात आहेत. त्यानुसार या पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
नवाब मलिक यांना झालेली अटक बेकायदेशीर आहे, माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनाही असेच फसवले पण शेवटी काहीच साध्य झाले नाही. यातूनही होणार नाही. कितीही त्रास द्या, आता जीव गेला तरी चालेल पण भाजपला सोडणार नाही, असा थेट इशारा अमोल मिटकरी यांनी दिला आहे.
दरम्यान, तब्बल साडेसात तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिक यांना अटक करण्यात आली. विशेष न्यायालयाने मलिकांना 3 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. ईडीच्या कारवाईनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काल राष्ट्रवादी पक्षाच्या प्रमुख नेत्यांची तसेच राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या प्रमुख नेत्यांच्या बैठका झाल्या. त्यात मलिक यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.