नवी दिल्ली – राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सध्या उत्तर प्रदेशातून असून लवकरच ही यात्रा कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या रायबरेली मतदारसंघात दाखल होणार आहे. मात्र त्यापूर्वीच येथील कॉंग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. रायबरेलीच्या सालोन येथील जिल्हा स्तरावरील नेते आणि कार्यकर्ते यांनी भाजपची वाट धरली असल्याची माहिती आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनाच या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सोनिया गांधी यांनी प्रदीर्घ काळ रायबरेली मतदारसंघाचे लोकसभेत प्रतिनिधीत्व केले आहे. मात्र त्यांनी आता लोकसभेऐवजी राज्यसभेत जाण्याचा निर्णय घेतला आहे व राजस्थानमधून त्यांनी अर्जही दाखल केला आहे. कॉंग्रेसचे त्या राज्यातील संख्याबळ पाहता सोनिया सहज विजयी होऊन राज्यसभेत जाणार आहेत. दरम्यान, राहुल यांची यात्रा उत्तर प्रदेशात सहा दिवस थांबणार आहे. आज प्रयागराज येथून ते अमेठीकडे दाखल झाले.
सोनिया यांच्यानंतर त्यांच्या कन्या प्रियंका गांधी रायबरेलीतून लढणार असल्याच्या चर्चा आहेत. मात्र त्यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही. निश्चितपणे गांधी कुटुंबातील सदस्यच येथून निवडणूक लढवणार असा दावा कॉंग्रेसचे उत्तर प्रदेश प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी केला आहे. २०१९ च्या निवडणुकीत केवळ रायबरेली येथूनच कॉंग्रेसला विजय मिळाला होता. आता जर गांधी कुटुंबातील कोणी सदस्य येथून रिंगणात उतरला नाही तर कॉंग्रेसला ही जागाही गमवावी लागू शकते अशी आजची स्थिती आहे.
इराणींची टिप्पणी
स्मृती इराणी यांनी अमेठी, राहुल गांधी आणि रायबरेलीच्या संदर्भात केलेल्या टिप्पणीमुळे कॉंग्रेसच्या गोटात चिंता निर्माण झाली आहे. जे लोक अमेठीला सत्तेचे केंद्र मानत होते ते आज वाजतगाजत अमेठीला पोहोचले तर त्यांचे स्वागत करायला कोणी नव्हते. त्यासाठी प्रतापगढ आणि सुलतानपूर येथून लोकांना बोलवावे लागले असे त्या म्हणाल्या. राहुल यांचे नाव न घेता त्यांनी वायनाड येथे राहुल यांनी अमेठीच्या संदर्भात केलेल्या विधानाचे स्मरण करून दिले.
अमेठीच्या लोकांची राजकीय समज अयोग्य आहे असे राहुल म्हणाले होते असा दावा इराणी यांनी केला आणि यामुळेच त्यांच्याविरोधात संताप असल्याचे इराणींनी नमूद केले. त्या म्हणाल्या कॉंग्रेसने अमेठी गमावलीच आहे आणि आता रायबरेलीही या कुटुंबाने सोडून दिले आहे व दोन्ही जागांवर भारतीय जनता पार्टीचाच विजय होणार आहे. इंडिया आघाडी आता अस्तित्वात तरी राहीली आहे का अशी विचारणा करतानाच आता अखिलेश यादवही लवकरच त्यांची साथ सोडतील. जे स्वत:ला सांभाळू शकत नाही ते दुसऱ्यांना काय सांभाळणार अशी टीकाही त्यांनी केली.