नारायणगाव (पुणे) -वारूळवाडी-मांजरवाडी रोडवरील अष्टविनायक महामार्गाची दुरवस्था झाली आहे. नागरिकांना शारीरिक व मानसिक त्रास होत असल्याने तातडीने दुरुस्त करण्याची मागणी वारूळवाडी ग्रामस्थांनी आमदार अतुल बेनके यांना निवेदन देऊन केली आहे.
वारूळवाडी गावातून गेलेल्या अष्टविनायक महामार्गाच्या अपूर्ण कामामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात धुळीचा व खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये बंद झालेले काम अद्याप चालू न झाल्यामुळे परिसरातील नागरिक संभ्रम अवस्थेमध्ये आहेत. या रस्त्याच्या दुतर्फा अपूर्ण अवस्थेतील गटारे व ओढ्यांवर बांधलेल्या मोऱ्यादेखील अपूर्ण अवस्थेत आहेत. अशा परिस्थितीमध्ये या रोडचे काम तात्काळ होणे गरजेचे आहे. यासंदर्भात माजी ग्रामपंचायत सदस्य आशिष फुलसुंदर, आम्ही वारूळवाडीकर मंचचे सतेज भुजबळ, माजी ग्रामपंचायत सदस्य परशुराम वारुळे, राजेंद्र फुलसुंदर व इतरांनी आमदार अतुल बेनके यांची भेट घेऊन रस्त्याच्या दुरवस्थेविषयी निवेदन दिले. सध्या नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल सविस्तर माहिती दिली. यावेळी आमदार अतुल बेनके यांनी वारूळवाडीतील ग्रामस्थांसमोरच दिवाळीनंतर तात्काळ अष्टविनायक महामार्गाचे काम चालू करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.