भोपाळ – मध्य प्रदेशातील 28 जागांसाठी झालेली पोटनिवडणूक ही विकास आणि विनाश यापैकी कशाची निवड करायची यासाठी होती. जनेतेने विकासाची निवड केली अशी प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे नेते शिवराज सिंह चौहान यांनी व्यक्त केली आहे.
भाजपच्या पंधरा वर्षांच्या राजवटीत मध्य प्रदेश विकासाच्या मार्गावर आले होते. मात्र कमलनाथ आणि कॉंग्रेसच्या केवळ पंधरा महिन्यांच्या राजवटीत राज्याला पुन्हा विनाशाच्या मार्गावर नेण्याचे काम करण्यात आले.
कॉंग्रेस पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात जी आश्वासने दिली होती, ती सर्व नाकारली. जनतेला फसवले, लोकप्रतिनिधींचा अपमान केला. ज्या लोकांची कमलनाथ सरकारकडून फसवणूक झाल्याची भावना झाली ते लोक सत्य आणि न्यायाच्या बाजूने उभे राहीले. लोकशाहीत मतदाता हेच सगळ्यांत मोठे न्यायालय असते व त्या न्यायालयाने आज आपला फैसला जाहीर केला आहे.
कॉंग्रेस पक्षाकडून इलेक्ट्रॉनिक वोटींग मशिनबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्याबाबत बोलताना शिवराज सिंह म्हणाले की, कॉंग्रेसच्या दुहेरी व्यक्तीमत्वाचाच हा भाग आहे. पंधरा महिन्यांपूर्वी ते निवडून आले होते, त्यावेळीही हीच यंत्रे होती.
भाजपमध्ये प्रचंड गटबाजी असल्याचा दावाही कॉंग्रेसकडून केला जात होता. त्याचा समाचार घेताना शिवराज म्हणाले की सावन के अंधे को हर जगा हरा हरा दिखता है. वास्तविक कॉंग्रेस पक्षातच चार पाच कॉंग्रेस आहेत. त्यामुळे त्यांना एक गोष्ट अजुन समजली नाही ती म्हणजे भारतीय जनता पार्टीत केवळ एकच पार्टी आहे. येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह वॉर्डस्तरावर कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यापर्यंत सगळेच कार्यकर्ते आहेत.
विजयाचे श्रेय ज्योतिरादित्य शिंदे यांना देणार का, असे विचारल्यावर त्यांच्या भाजपमध्ये येण्यामुळे पक्षाची ताकद वाढली असल्याची टीप्पणी चौहान यांनी केली.