मंचर -प्रत्येक गावात करोना दक्षता समित्या स्थापन करून त्यांच्या माध्यमातून जनजागृतीवर भर दिला पाहिजे. या विषाणूवर अद्यापर्यंत कोणतेही औषध, लस बाजारात उपलब्ध नसल्यामुळे आपल्याला करोनासोबत जगायला शिकले पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
मंचर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण, महाद्वार नूतनीकरण कामाचे व कार्डियाक अँब्युलन्सचे ऑनलाइन उद्घाटन मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. ऑनलाइन कार्यक्रमात कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, मंचर येथे व्यासपीठावर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार सुरेश गोरे, शरद बॅंकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, उद्योजक हर्षल मोरडे, सरपंच दत्ता गांजाळे, उपसरपंच धनेश मोरडे, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, अन्यायाविरुद्ध लढण्याचे तेज ज्या मातीत रुजले आहे, त्या मातीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेली नगरी आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी ठरलेली आहे. भक्ती आणि शक्तीचा संगम या भूमीत आपल्याला बघायला मिळतो. या पट्ट्यात अनेक महान संत, क्रांतीकारक होऊन गेले आहेत. त्यांच्याकडून आपण लढण्याचा व जिंकण्याचा गुण आत्मसात केला पाहिजे. आपल्या दैनंदिन जीवनात त्याचा उपयोग केला पाहिजे.
आढळराव पाटील म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते 1978 साली मंचर येथे छत्रपती शिवाजी महाराज वेशीचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला होता. त्यानंतर तब्बल 42 वर्षांनी या वेशीचे भव्यदिव्य महाद्वारामध्ये रूपांतर करण्यात येऊन छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यासह नूतनीकरण केले आहे. ग्रामपंचायत निधीतून 28 लाखांची कार्डियाक अँब्युलन्स खरेदी केलेली आहे. या अँब्युलन्समध्ये व्हेंटीलेटर, डिफायब्रीलेटर, ऑक्सिजन मशीन, मॉनिटर्स आदि करोनाविरोधात लढण्यासाठी सुसज्ज मशीन्स बसविल्या आहेत.
सरपंच गांजाळे यांच्या कार्यकाळात मंचरनगरीचा मोठा विकास झाला आहे. लोकांना सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत. प्रास्ताविकात मंचरचे सरपंच दत्ता गांजाळे यांनी मंचर शहरात झालेल्या विकासकामांचा आढावा घेतला. सूत्रसंचालन जागृती महाजन यांनी केले, वसंतराव बाणखेले यांनी आभार मानले.
मंचरच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल, असा हा दिवस आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा मंचरच्या वैभवात भर घालणारा असून तो सर्वांनाच प्रेरणा देत राहील. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन उत्तम काम करीत असून नागरिकांनीही प्रशासनास सहकार्य करावे. ग्रामपंचायतीने खरेदी केलेल्या कार्डियाक अँब्युलन्सचा उपयोग तालुक्यातील नागरिकांना होईल. -दिलीप वळसे-पाटील, कामगार मंत्री.
सरपंच गांजाळे यांचे कौतुक
प्रारंभी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्व. किसनराव बाणखेले यांचे स्मरण केले. तसेच जुन्या आठवणींना उजाळा देऊन कार्यक्रमाची सुरुवात केली. मंचरचे सरपंच दत्ता गांजाळे यांच्या कार्याचे तोंडभरून कौतुक करीत करोनाच्या महामारीत त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यासाठी फोन केल्याची आठवणही त्यांनी यावेळी करून दिली.
भगवा आणखी भव्य होईल
मंचर ग्रामपंचायतीची मुदत संपत आहे. येणाऱ्या काळातही येथे भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. आता यावेळी आमचे सहकारी शिवाजीराव आढळराव यांच्या समवेत माझे मंत्रिमंडळातील सहकारी दिलीप वळसे पाटील आहेत. कॉंग्रेसही सोबत आहे. त्यामुळे भगवा अजून भव्य होईल, असा आशावाद मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केला.