नवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी होताना दिसत आहे. तसेच कोरोनाला रोखण्यासाठी वेगवेगळ्या लसी येत आहेत. याच लसींचे वाटप करण्यासाठी आता केंद्र सरकार सज्ज झाले असल्याचे दिसत आहे. त्यासाठीच करोना लसीकरण मोहिमेत समन्वयासाठी आणि देखरेख ठेवण्यासाठी समित्या स्थापन कराव्यात आणि या मोहिमेमुळे नियमित आरोग्यसेवांमध्ये फारसे अडथळे येणार नाहीत, याचीही दक्षता घ्यावी, अशा सूचना केंद्र सरकारकडून राज्यांना देण्यात आल्या आहेत.
लसीकरण मोहिमेवरील संभाव्य विपरीत परिणाम टाळण्यासाठी समाजमाध्यमांवरून प्रसारित आणि अग्रेषित करण्यात येणाऱ्या अफवांचाही वेळीच बंदोबस्त करावा, असेही केंद्र सरकारने राज्यांना कळवले आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी याबाबत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र पाठविले आहे.
करोना लसीकरण मोहीम जवळपास वर्षभर चालणार आहे. त्यामध्ये अनेक गट सहभागी होतील. लसीकरण मोहिमेची सुरुवात आरोग्यक्षेत्रातील कर्मचाऱ्यांपासून होणार आहे. त्यामुळे राज्य आणि जिल्हा पातळीवर समित्यांची स्थापना करावी, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सूचित केले आहे.
राज्यांच्या समित्यांनी शीतगृहांची सज्जता करावी, कार्यवाहीचे नियोजन करावे आणि आपल्या पुढील आव्हानांचा विचार करून अगदी दुर्गम भागांतही पोहोचता येईल, अशी रणनीतीही राज्यांनी आखावी, असेही आरोग्य मंत्रालयाने सूचना देताना स्पष्ट केले आहे.