– शेरखान शेख
शिक्रापूर – ग्रामीण भागातील शाळा दिवाळीनंतर अनेक आचके देत पुन्हा सुरु झाल्या खऱ्या मात्र एस. टी कामगारांच्या संपामुळे गावागावांतील विद्यार्थ्यांसमोर पुन्हा अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी करोनातून सुटले अन एस.टी आंदोलनाच्या फेऱ्यात अडकले, अशी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची स्थिती निर्माण झाली आहे.
कान्हूर मेसाई (ता. शिरूर) येथील विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील जवळपास अडीचशे मुले, मुली दररोज एसटीने प्रवास करून शाळेत येत असतात. परिसरातील
दुर्गम भागातील मलठण, लाखेवाडी, शास्ताबाद, मोराची चिंचोली, खैरेनगर आदी ठिकाणावरून येणाऱ्या मुलांसमोर करोनानंतर शाळा सुरू झालेल्या असताना एस. टी कामगारांच्या संपामुळे असंख्य अडचणी निर्माण झाल्या आहेत.
सध्या पेट्रोलचे दर गगनाला भिडल्याने पालक मुलांना दुचाकी देण्यास तसेच मुलांना शाळेत सोडण्यासाठी टाळाटाळ करताना दिसून येत आहे. दीपावलीच्या अगोदर विद्यार्थ्यांच्या परीक्षा
झाल्या असून आता वर्गात शिक्षक उत्तरपत्रिका तपासून देत आहेत. अशावेळी शाळेत न आल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना आपल्याला किती गुण मिळाले हे समजत नाही.
मात्र दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांच्या पालकसभा घेणे गरजेचे असल्याने शिक्षकांना त्यांचे काम करणे गरजेचे आहे. मात्र मुलांना उत्तरपत्रिका देताना मुलांची अनुपस्थिती शिक्षकांना जाणवत आहे.
विद्यार्थ्यांना शाळेत यायचे म्हटले तर उन्हातून एक तास पायी प्रवास करावा लागत आहे. मात्र शाळेच्या महत्वाच्या काळात विद्यार्थी शाळेत गैरहजर राहिले तर त्यांचे शैक्षणिक नुकसान कसे भरून काढायचे असा प्रश्न पालक व शिक्षकांना भेडसावत आहे.
तर शाळेमध्ये शिक्षण घेत असताना वाहन नसल्याने घरापासून पायी शाळेत यावे लागत असल्याने विद्यार्थी थकून जात आहेत. त्यामुळे शाळेत अभ्यासाकडे लक्ष लागत नाही तसेच शाळेतून घरी पायी थकत जावे लागत असल्याने घरी अभ्यास होत नाही. विद्यार्थिनींना घरातील कामांना वेळ देता येत नाही.
त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा देखील प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे जीवन इकडे आड, तिकडे विहीर असे झाले आहे. करोनातून सुटका घरून घेताच विद्यार्थी एसटीच्या अडचणीमध्ये अडकले असल्याचे दिसून येत आहे.
मलठण येथील शिंदेवाडी येथून दररोज कान्हूर मेसाई येथील विद्याधाम विद्यालयात येत असताना शिंदेवाडी ते मलठण आणि मलठणवरून कान्हूर मेसाई असा प्रवास मी एसटी बसने करते. मात्र सध्या एस.टी कामगारांचा संप असल्याने शाळेत ये-जा करणे अवघड होत आहे. बारावीचे महत्वाचे वर्ष असून हा संप लवकरच मिटावा अशी अपेक्षा आहे.
– ऋतुजा शिंदे, विद्यार्थिंनी मलठण
मुलांना शिक्षण घेण्यासाठी मोठी पायपीठ करावी लागत आहा. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. परंतु शासनाने या प्रश्नाकडे गंभीरपणे पाहणे तसेच विद्यार्थ्यांचे नुकसान टाळणे गरजेचे आहे.
– अनिल शिंदे, प्राचार्य कान्हूर मेसाई