चीनशी झालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर चिनी वस्तूंवर बहिष्काराची साद घातली जात आहे. त्याच्या शक्याशक्यतेबाबत ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांच्याशी प्रभातने साधलेला संवाद.
करोनानंतरच्या जगात भारताने आत्मनिर्भर बनले पाहिजे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्यासाठी आजची परिस्थिती ही एकदम योग्य आहे. आत्मनिर्भर बनण्यासाठी आपल्याला तीन गोष्टींची गरज आहे, ते म्हणजे टॅलेंट, टेक्नॉलाजी आणि ट्रस्ट. महत्त्वाचे म्हणजे यापैकी टॅलेंट म्हणजेच कौशल्य ही भारताची जमेची बाजू आहे. त्यामुळेच आत्मनिर्भर बनण्याची क्षमता आपल्यात आहे. करोना उद्रेकामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीने चीनबद्दल लोकांच्या मनात प्रचंड असंतोष आहे. त्यात भारतीय जवानांसोबत झालेल्या संघर्षाने देशात संतापाचे वातावरण आहे.
जागतिक स्तरावर अनेक देश आता चीनसोबतच व्यवहार करण्याबाबत साशंकता व्यक्त करत आहेत. अनेकांनी तर आपली गुंतवणूकदेखील काढून घेतली आहे. अशा काळात चीनसाठी एक महत्त्वपूर्ण पर्याय म्हणून भारताकडे पाहिले जात आहे. त्यामुळेच आपल्याकडील व्यवहारकौशल्य वाढवत आपण आर्थिकदृष्ट्या अधिक प्रगल्भ होऊ शकतो. तशी क्षमताही आपल्यामध्ये आहे.
करोना आपत्तीत आपल्याला टेस्टिंग किट, व्हेंटिलेटर्स, पीपीई किट यासारख्या अनेक वैद्यकीय संसाधनांची कमतरता होती. मात्र, ही गरज पूर्ण करण्यासाठी अनेक कंपन्यांनी पुढाकार घेत या कमतरतेवर मात मिळविली. यामध्ये सरकारी, खासगी, वैयक्तिक अशा सर्वच स्तरावरील लोकांनी एकत्र येत आपले योगदान दिले.
आपणही कमी किमतीत दर्जेदार उत्पादने निर्माण करू शकतो हे दाखवून दिले. त्यामुळे आपल्याकडे कौशल्या आहे. आपणही तंत्रज्ञान विकसित करू शकतो. मात्र, त्यासाठी आत्मविश्वास बाळगण्याची गरज आहे. त्याचबरोबर सरकारी पातळीवर एक आक्रमक आणि व्यापक खरेदी धोरण तयार करून आपल्याकडील नावीन्यपूर्ण उद्योजकांना आधार देण्याची गरज आहे.