18 महिन्यांपासून पद रिक्त
वाल्हे- येथील महावितरण शाखेत मागील 18 महिन्यांपासून अधिकारी नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे वाल्हे शाखेला कायम स्वरूपी अधिकारी नियुक्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
1 मार्च 2018 रोजी कनिष्ठ अभियंता टी. बी. भोसले सेवानिवृत्त झाले होते. यानंतर वाल्हे येथील महावितरणच्या ऑफिसला आजपर्यंत कायमस्वरूपी अधिकारी मिळाला नाही. त्यामुळे ग्राहकांचे अनेक काम प्रलंबित राहात आहेत. नवीन मीटर बसविणे, वीजबिल दुरूस्ती करणे आदी कामे करण्यासाठी ग्राहकांना नीरा किंवा जेजुरी येथील कार्यालयामध्ये जावे लागते. वाल्ह्यासह जेऊर, मांडकी, दौंडज, पिंगोरी, आडाचीवाडी, सुकलवाडी, वागदरवाडी या ग्रामपंचायतींच्या अंतर्गत वाड्या-वस्त्या येतात. सण, उत्सावामध्ये येथे विजेची जास्त मागणी असते, परंतु वाल्हे शाखेत शाखा अभियंता नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.