दुबाकी, मोबाइल, केबल वायर, पाकीटमारीचे प्रमाण वाढले
नांदुूर, दि. 30 (वार्ताहर) ः येथील आठवडे बाजारातून सर्वसामान्य नागरिकांच्या साहित्याची चोरी होण्याच्या घटनेमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून, बुधवारी आठवडे बाजाराच्या दिवशी चोऱ्याचे प्रमाण चांगलेच वाढल्याने सर्वसामान्य नागरिक हतबल झाले होते.
बुधवारी (दि. 28) विजय तुकाराम सोनवणे यांची दुचाकी मुख्य चौकातील घरापासून संध्याकाळी साडेसातच्या सुमारास चोरीला जाण्याचे प्रकार घडला, तर येथील व्यावसायिक बाळु बेटकर यांचा मोबाइल चोरट्यांनी मागील आठवडे बाजारात लंपास केला, त्यानंतर त्यांनी नवीन मोबाइल घेतला; पण पुढील आठवड्यामध्येही पुन्हा त्यांचा मोबाइल चोरीस गेल्याची घटना घडली. दहीटणे, पिंपळगाव येथील शेतकऱ्याचे केबलवायर चोरीस गेल्या. मोबाइल, दुचाकी चोरी, पाकीटमारी असले प्रकार घडत असताना ग्रामीण पोलिसांचे या प्रकाराकडे दुलर्क्ष होत असताना दिसून येत आहे.
राहु बेट (ता. दौंड) परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर परप्रांतियांनी गुऱ्हाळघरे भाडे तत्वावर चालविण्यास घेतली असून, वीटभट्टी कामगार, उसतोडणी कामगारांची संख्याही मोठ्या प्रमाणावर असून, यांची कसलीच माहिती स्थानिक मालक ठेवत नसल्याची परीस्थिती आहे. मागील काही दिवसापासून राहु बेट परिसरामध्ये अज्ञात व्यक्तीच्या खुनाचे प्रमाणही वाढले असून, या प्रकाराकडे कानाडोळा केल्यामुळे गुन्हेगारी विश्वामध्ये राहु बेट परिसर परिचित झाला आहे.