पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – कोविडपासून नांदेडच्या मृत्यूच्या घटनेपर्यंत आरोग्य व्यवस्थेचे विदारक अनुभव लोकांनी घेतले. आता जनतेला हक्काची आरोग्य सेवा मिळण्याची तत्काळ आरोग्य सेवा हक्काचा कायदा राज्यात लागू करावा, असा ठराव राज्यस्तरीय आरोग्य हक्क संसदेत करण्यात आला. जन आरोग्य अभियानाच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी राज्यातील आरोग्याच्या स्थितीवर भाष्य करणारे 10 भागांचे रिपोर्टकार्ड लोकांसमोर मांडण्यात आले. यावेळी भारत जोडो अभियानाच्या राज्य समन्वयक उल्का महाजन, काँग्रेसचे राज्य प्रवक्ते सचिन सावंत, भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या कॉ. लता भिसे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे डी. एल. कराड, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रशांत जगताप, वंचित बहुजन आघाडी जाहीरनामा समितीचे प्रमुख प्रियदर्शी तेलंग, आम आदमी पक्षाचे राज्य कार्यकारी अध्यक्ष अजित फाटके, जन स्वास्थ अभियानचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. अभय शुक्ला, डॉ. अनंत फडके उपस्थित होते.
उल्का महाजन म्हणल्या, आरोग्य, शिक्षण, रोजगार हे प्रश्न चिरडले गेले असून, या देशातील लोकशाही आजारी आहे. तिला निरोगी करण्याची जबाबदारी आपली आहे. यावेळी अन्य मान्यवरांनी मनोगत मांडले. डॉ. अभय शुक्ला यांनी आभार मानले. तर दीपक जाधव यांनी सूत्रसंचालन केले.