प्रत्येक घुसखोराला हुडकून देशाबाहेर घालवणार
चक्रधरपुर : झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी एनआरसीचा मुद्दा प्रमुख मुद्दा केला आहे. येथील जाहींर सभांमध्ये बोलताना ते म्हणाले की देशातील प्रत्येक घुसखोर हुडकून काढून त्याला देशाबाहेर घालवले जाईल. त्यासाठी सन 2024 पर्यंत देशातील प्रत्येक राज्यात एनआरसी लागू करून प्रत्येक नागरीकाच्या नागरीकत्वाची तपासणी करून घुसखोर हुडकून काढले जातील असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
पश्चिम बंगाल मधील पोटनिवडणुकीच्या प्रचारात भाजपने हाच एनआरसीची मुद्दा लाऊन धरला होता पण तेथील तिन्ही पोटनिवडणुकांमध्ये भाजपला पराभव स्वीकारावा लागला आहे. पण त्याने खचून न जाता अमित शहा यांनी झारखंडच्या प्रचारात हाच प्रचाराचा प्रमुख मुद्दा केला आहे. आम्ही घुसखोरांना बाहेर काढण्याच्या प्रयत्नांत आहोत पण राहुल बाबा मात्र त्यांना देशाबाहेर घालवण्यास तयार नाहीत अस ते म्हणाले.
ते कोठ जातील? काय खातील? असे प्रश्न त्यांना पडतात पण सन 2024 ची निवडणूक येण्यापुर्वी देशातील प्रत्येक घुसखोराला देशाबाहेर घालवले जाईल असा दावाही अमित शहा यांनी यावेळी केला. ते म्हणाले की झारखंडच्या निवडणुकीत स्थानिक प्रश्न महत्वाचे असले तरी त्याच बरोबर दहशतवाद, नक्षलवाद, राम मंदिराची उभारणी, हेही तितकेच महत्वाचे प्रश्न आहेत.
राम मंदिराचा विषय उपस्थित करून ते म्हणाले की कॉंग्रेसने राम मंदिर प्रकरणातील सुप्रिम कोर्टातील सुनावणी प्रलंबीत ठेवण्याचा खूप प्रयत्न केला. या प्रकरणाची सुनावणी घेण्याची गरज नाही असे कॉंग्रेस नेते सुप्रिम कोर्टात सांगत राहिले असा आरोप त्यांनी केला. पण लोकांच्या पाठींब्याने आम्ही या सुनावणीला गती दिली आणि त्यामुळे आज राम मंदिर उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे असे ते म्हणाले. गेल्या पाच वर्षात भाजप सरकारने येथील नक्षलवादाचे आव्हान संपुष्ठात आणले असेही शहा यांनी यावेळी नमूद केले.