रांची – झारखंडमध्ये वृद्धपाकाळ निवृत्ती वेतनासाठी पात्रता वय ६०वरून ५० वर्षांपर्यत कमी करण्यात आले आहे, अशी घोषणा झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी आज केली. तसेच राज्यातील कंपन्यांमध्ये ७५ टक्के नोकऱ्या स्थानिक लोकांसाठी राखीव असतील, असेही ते म्हणाले.
हेमंत सोरेन म्हणाले की, झारखंड हे देशातील सर्वात गरीब राज्य आहे. कोविड-19 महामारी आणि राज्यात पडलेल्या दुष्काळाशी झुंज देत आहे. मात्र असे असतानाही राज्य सरकारमध्ये अनागोंदी कारभार दिसत नाही. झारखंडसारख्या गरीब राज्याने इतर राज्यांना ऑक्सिजनचा पुरवठा केल्याचा दावा त्यांनी केला. साथीच्या काळात गरीब मजूर वाचले. मात्र दोन मंत्र्यांना आपला जीव गमवावा लागला.