वाघोली – येथील विजेअभावी पथदिव्यांचा प्रश्न गंभीर झाला होता. वीज बिलाचा भरणा न केल्याने पथदिवे बंद होते. तसेच वाघोली मधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाड्या यामधील वीजदेखील बंद करण्यात आली होती. पुणे महानगरपालिकेकडे पाठपुरावा करून महावितरणचे दोन कोटी 42 लाख रुपये विज बिल भरून वाघोली मधील पथदिवे व शाळांची वीज पूर्ववत सुरू करण्यात आली असल्याची माहिती सरपंच वसुंधरा उबाळे व माजी सरपंच शिवदास उबाळे यांनी दिली.
वाघोली ची लोकसंख्या जवळपास दोन लाखाच्या आसपास पोहोचली आहे. अनेक दिवसांपासून वीज बिलाचा भरणा न केल्याने पथदिव्यांचा वीजपुरवठा महावितरणकडून बंद करण्यात आला होता. तसेच वाघोली मधील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा व तसेच तेरा अंगणवाड्या यामध्ये देखील असणारी वीज बिल न भरल्याने बंद करण्यात आली होती.
शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वाघोली चे सरपंच वसुंधरा उबाळे व माजी सरपंच शिवदास उबाळे यांनी पाठपुरावा करून पुणे महानगरपालिकेकडून सततच्या पाठपुराव्याने महानगरपालिकेने दोन कोटी 42 लाख रुपयांचा भरणा केल्यानंतर ही वीज पूर्ववत करण्यात आली आहे. वाघोली च्या सरपंच वसुंधरा उबाळे, माजी सरपंच शिवदास उबाळे यांनी पुणे महानगरपालिकेकडे वीज बिलाचा भरणा करण्यासाठी पाठपुरावा केल्याबद्दल नागरिकांकडून उबाळे कुटुंबीयांचे आभार मानले जात आहे.