मुंबई – राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या रखडलेल्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिष्टमंडळाने नुकतीच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यानंतर आता राष्ट्रवादीच्या कोट्यातून संधी मिळालेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा पत्ता कापला गेल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे. त्यांच्या जागी माजी आमदार हेमंत टकले यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.
बुधवारी रात्री राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे एक शिष्टमंडळ गेले होते.
यावेळी या शिष्टमंडळाने मागील अनेक महिन्यांपासून प्रलंबित असणाऱ्या आमदारांची नियुक्ती करण्यात यावी अशी विनंती राज्यपालांना केली. परंतु राज्यपालांनी मागच्या निवडणुकांमध्ये पराभूत झालेल्या उमेदवारांची नावं यादीत कशी काय अशी विचारणा केली. तसेच मागील काही दिवसांपासून राजू शेट्टी यांनी सरकारविरोधात काढलेले मोर्चे आणि आंदोलन याला कारणीभूत असल्याचे समजते. त्यानंतरच राजू शेट्टी यांचा पत्ता कट झाला असल्याची चर्चा रंगू लागली.
एकीकडे राजू शेट्टी यांचा पत्ता कट झाल्याची चर्चा असताना आता दुसरीकडे त्यांच्या जागी माजी आमदार हेमंत टकले यांना संधी देण्यात आल्याची देखील माहिती सूत्रांनी दिली. हेमंत टकले हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निष्ठावंत सहकारी मानले जातात. शिवाय ते याआधी दोनवेळा विधान परिषदेचे सदस्य देखील राहिले आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची ज्यावेळी भेट घेण्यात आली. त्याचवेळी या नावाची शिफारश करण्यात आली असल्याची चर्चा आहे
दरम्यान, राजू शेट्टी यांचा पराभूत उमेदवार म्हणून जर पत्ता कट होणार असेल तर मग राज्यपाल नियुक्त सदस्यांमध्ये आणखी दोन व्यक्ती अशा आहेत ज्या मागील लोकसभेला पराभूत झाल्या आहेत. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा निवडणुक लढलेले प्राध्यापक यशपाल भिंगे आणि कॉंग्रेसकडून निवडणुक लढलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचाबाबत महाविकास आघाडी काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वपूर्ण राहिल.
पराभूत उमेदवारांच्या नावाबाबत आक्षेप आहे. पुनर्विचार करावा लागेल. हेमंत टकले यांचे नाव माध्यमांमध्ये हे नाव कुठून आले, मला माहिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
– अजित पवार, उपमुख्यमंत्री