नवी दिल्ली -सध्या राजकारण घुसळून काढणाऱ्या विधानसभा निवडणुकांमुळे इंडिया या विरोधी पक्षांच्या आघाडीत तणातणी सुरू झाल्याचे दिसते. मात्र, त्या निवडणुकांचे निकाल इंडियासाठी फेव्हिकॉलचे काम करतील, असे भाकीत कॉंग्रेसने केले आहे. त्यातून निकाल विरोधी पक्षांचा उत्साह वाढवणारे आणि त्यांना मजबुतीने जोडणारे असतील, असे कॉंग्रेसने सूचित केले.
देशातील पाच राज्यांत विधानसभा निवडणुकांची प्रक्रिया सुरू आहे. तो रणसंग्राम सुरू असलेल्या मध्यप्रदेशात कॉंग्रेसशी हातमिळवणी करण्यास समाजवादी पक्ष (सप) उत्सुक होता. मात्र, जागावाटपाची बोलणी फिस्कटल्याने सपचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी कॉंग्रेसला उत्तरप्रदेशात जशास तसे वागण्याचा इशारा दिला.
त्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही कॉंग्रेसविषयी नाराजी व्यक्त केली. कॉंग्रेस विधानसभा निवडणुकांमध्येच व्यस्त आहे. त्यामुळे इंडियाची वाटचाल ठप्प झाली आहे, अशा आशयाचे वक्तव्य त्यांनी केले. त्यावरून इंडियामध्ये धुसफूस सुरू झाली असल्याची खिल्ली भाजपकडून उडवली जात आहे.
त्या पार्श्वभूमीवर, कॉंग्रेस सुत्रांनी इंडियाविषयी भूमिका मांडली. विधानसभा निवडणुकांत कॉंग्रेसने बाजी मारल्यास इंडियाला बळकटीच मिळेल. त्या निवडणुकांच्या निकालांनंतर इंडियामधील घटक पक्ष आपोआपच फेव्हिकॉलचा वापर झाल्याप्रमाणे घट्टपणे जोडले जातील, असा विश्वास त्या सुत्रांनी व्यक्त केला.
इंडियाची स्थापना विधानसभा निवडणुकांसाठी नव्हे; तर लोकसभा निवडणुकीसाठी असल्याच्या पक्षाच्या भूमिकेचाही त्यांनी पुनरूच्चार केला. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेने देशातील वातावरण ढवळून काढले. त्या यात्रेच्या पुढील टप्प्याचे आयोजन होऊ शकते, असे संकेतही पक्षाच्या सुत्रांनी दिले.