नवी दिल्ली – भारतीय फुटबॉल महासंघावरील (एआयएफएफ) बंदी मागे घेतली जावी यासाठी आता जागतिक फुटबॉल महासंघाचे (फिफा) सर्व नियम मान्य केले जाणार आहेत. त्यामुळे फिफाच्या निर्देशानूसार भारतीय महासंघाला निवडणूक घ्यावी लागणार आहे. तसेच या निवडणूकीत भारतातील सर्व 36 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांचा सहभाग असेल, असेही सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने स्पष्ट केले आहे.
एआयएफएफवरील बंदी मागे घेण्यासाठी तसेच 17 वर्षांखालील कुमारी विश्वकरंडक स्पर्धेचे यजमानपद राखण्यासाठी प्रशासकीय समिती हटवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला महासंघाने मान्यता देत ही समिती हटवली आहे.
फिफाच्या अटींनुसार निवडणूक घेण्याचा आदेश काढल्यामुळे आता नवी कार्यकारिणी 23 सदस्यीय असेल. यात सहा प्रमुख खेळाडूंचा समावेश असेल. यात चार पुरुष आणि दोन महिला खेळाडूंचा समावेश असेल.
महासंघाच्या या निर्णयाचे भारतीय फुटबॉल संघाचा माजी कर्णधार बायचुंग भुतियाने स्वागत केले असून निवडणुकीतून खेळाडूंचा मताधिकार काढून घेतल्याबद्दल नाराजीही व्यक्त केली. महासंघाची नवी घटना जेव्हा तयार केली जाइल तेव्हा त्यात खेळाडूंनाही मतदानाचा अधिकार मिळावा, यासाठी आम्ही केंद्र सरकार, महासंघ आणि सर्वोच्च न्यायालय यांच्याकडे पाठपुरावा करू, असे भुतियाने म्हटले आहे.