मुंबई : विधानसभा निवडणूकीची घोषणा होऊन आठवडाही उलटत नाही तोच शुक्रवारपासून उमेदवारांना अर्ज घेऊन दाखल करता येणार आहे. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत 4 ऑक्टोबर 2019 अशी आहे.
भारत निवडणूक आयोगाने 21 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार उद्या निवडणुकीची अधिसूचना जारी केली जाईल. त्यानंतर सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत इच्छुक उमेदवारांना अर्ज घेऊन तो भरता येईल. येत्या शनिवार आणि रविवारी म्हणजे 28, 29 सप्टेंबरला तसेच 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त शासकीय सुट्टी असल्याने या दिवशी उमेदवारी अर्ज मिळणार नाहीत तसेच स्वीकारण्यातही येणार नाहीत.
अर्ज भरण्यासाठी नवरात्रीचा मुहूर्त
सध्या पितृपंधरवडा सुरू आहे. रविवारी, 29 सप्टेंबर रोजी नवरात्रीची घटस्थापना आहे. त्यामुळे नवरात्रीचा मुहूर्त साधत 30 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर 2019 या दरम्यान उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गर्दी करतील. 4 ऑक्टोबरला दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जातील, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली.