जयशंकर यांनी फेटाळली चर्चेची शक्यता
न्यूयॉर्क : अतिरेकी दहशतवाद हे राजकीय साधन म्हणून वापरणाऱ्या शेजाऱ्याशी भारत चर्चा करू शकत नाही, अशा शब्दात परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानवर टीका केली. दहशतवादाचा वापर करून पाकिस्तान चर्चेसाठी भारतावर दबाव आणत आहे, असा आरोपही जयशंकर यांनी केला. बुधवारी येथे परराष्ट्र संबंधातील अग्रणी “कौन्सिल ऑन फॉरेन रिलेशन्स’मधील एका कार्यक्रमाला संबोधित करताना जयशंकर बोलत होते.
“भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मूलभूत प्रश्न काश्मीरचा आहे असे मला वाटत नाही. मला वाटते की हा आमच्या दरम्यानच्या मुद्द्यांचा एक भाग आहे.’ असे ते म्हणाले. भारतासाठी हा मुद्दा पाकिस्तानशी चर्चा करायची की नाही, हा नसून दहशतवाद चालवणाऱ्या देशाशी कसे बोलता येईल, हा आहे. प्रत्येकाला आपल्या शेजाऱ्याशी बोलायचे असते. मुद्दा असा आहे की ज्या देशात दहशतवाद आहे आणि हे जो देश नाकारूही शकत नाही, अशा देशाशी कसे काय बोलता येऊ शकेल? ते दहशतवाद करतात, मात्र करत नसल्याचे ढोंग करतात. तर, आपण त्याकडे कसे लक्ष द्याल आणि मला वाटते की हे आमच्यासाठी एक मोठे आव्हान आहे, असेही जयशंकर म्हणाले.
सीमावर्ती भागातून भारतात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचा संदर्भ जयशंकर यांनी दिला. पाकिस्तान जागतिक व्यापार संघटनेचा सदस्य आहे. शेजारी असूनही, पाकिस्तान भारताशी व्यापार करणार नाही, भारताने पाकिस्तानला “मोस्ट फेव्हर्ड नेशन’चा दर्जा दिला. परंतु कायदेशीररीत्या बंधनकारक असूनही तो दर्जा भारताला दिला जाणार नाही. जी प्रादेशिक सलग्नता इराण आणि अफगाणिस्तानबाबत दाखवली जाते, ती भारताबाबत दाखवली जाणार नाही. या सर्व गोष्टी आपण अद्याप हाताळू शकलो असतो, पण त्यांनी जे केले खरंच आज जगात स्वीकारले जाऊ शकत नाही, असे जयशंकर म्हणाले.