भोपाळ – मध्य प्रदेशातील कटनी जिल्ह्यात शनिवारी संध्याकाळी उशिरा एक मोठी दुर्घटना घडली. जिल्ह्यातील नर्मदा खोरे प्रकल्पांतर्गत बांधण्यात येत असलेला भुयारी बोगदा कोसळला असून यात अनेक कामगार अडकले आहेत. बांधकाम सुरू असलेला बोगदा कोसळल्याने 9 मजूर अडकल्याचे स्थानिक प्रशासनाने सांगितले.
यापैकी 5 मजुरांची सुटका करण्यात आली असून 4 मजुरांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे जवानांकडून सुरू होते. दरम्यान, कटनी जिल्ह्यात घडलेल्या या दुर्घटनेची माहिती मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून घेतली आहे.
चौहान यांनी या घटनेविषयी दु:ख व्यक्त करत जखमींना योग्य उपचार पुरवण्याचे निर्देश दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, स्लीमनाबाद येथील नर्मदा व्हॅली प्रकल्पांतर्गत नदीच्या उजव्या तीरावर बोगदा बनवण्याचे काम सुरू होते. नर्मदा नदीवरील बरगी धरण ते बाणसागरपर्यंत भूमिगत बोगद्याच्या कामादरम्यान माती खचल्याने खाली काम करणारे 9 मजूर अडकले. सुरुवातीला 3 मजुरांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.
बोगद्यात अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. इतर मजूर खोलात अडकल्याने वेळ लागत असल्याचे सांगण्यात आले. जिल्हा दंडाधिकारी आणि पोलीस अधीक्षकही घटनास्थळी पोहोचले असून ते बचावकार्यावर लक्ष ठेवून आहेत.