रेडा – इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे शेती पिकाचे वादळी वाऱ्यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. अश्या सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना,शासनाच्या माध्यमातून मदतीचा हात दिला पाहिजे हे माझे कर्तव्य आहे.नैसर्गिक संकट असल्यामुळे अशा संकटांचा सामना करावा लागतो या गोष्टीला पर्याय नाही.मात्र ज्यांचे – ज्यांचे नुकसान झाले आहे अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना, व घराची पडझड झालेल्या नागरिकांना घाबरण्याची गरज नाही. त्यांचे पंचनामे आजपासूनच तात्काळ केले जातील व नुकसानग्रस्तांना शासन मदत करेल असा शब्द सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिला.
इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी परिसरातील गोतंडी,शेळगाव,तसेच उजनी बॅकवॉटर पट्यातील गंगावळण कळाशी या परिसरातील ज्या केळी बागा शेतात उभ्या होत्या.त्या कोसळल्या आहेत तर ऊस,मका डाळिंब तसेच द्राक्ष बागांचे अतोनात नुकसान झाले.या सर्व परिसराची पाहणी सार्वजनिक बांधकाम पशुसंवर्धन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शुक्रवार (ता. 28 रोजी) केली.यावेळी इंदापूरचे तहसीलदार अनिल ठोंबरे इंदापूर तालुका कृषी कार्यालयाचे अधिकारी महसूल विभागाचे अधिकारी व पंचायत विभागाचे अधिकारी उपस्थित होते.यावेळी पत्रकारांशी संवाद सांगताना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे बोलत होते.
यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ज्या शेतकऱ्यांचे नुकसान वादळी वाऱ्याने,पावसाने झालेले आहे त्या सर्व शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश तसेच या नागरिकांच्या घराचे नुकसान झाले आहे अशाही घरांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश संबंधित पाहणी दौऱ्यात दिले आहेत.
अचानक वादळी वारा व पाऊस झाल्यामुळे शेतीचे नुकसान प्रचंड झालेले आहे.गोरगरीब जनतेचा प्रपंच खऱ्या अर्थाने शेतीवर अवलंबून असतो आणि शेतीतील पिके नेस्तनाबूत होत असतील तर त्यांच्या अर्थकारणावर मोठा फटका बसतो. म्हणून तात्काळ शासनाच्या माध्यमातून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी कटीबद्ध राहणार आहे अशीही माहिती राज्यमंत्री भरणे यांनी दिली.
पुढे बोलताना राज्यमंत्री भरणे म्हणाले की, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस व वाऱ्याचा वेग जास्त असल्यामुळे शेती पिकांचे जास्त नुकसान झाले आहे.मात्र राज्य सरकार हे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे सरकार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही.
मागील दोन वर्षापासून अनेक संकटाशी सामना नागरिकांना व जनतेला करावा लागतो आहे. मात्र बळीराजा आपली शेती पडीक न ठेवता वेगवेगळे प्रयोग शेतात राबवतो.व शेती पिकवतो आणि येणाऱ्या आपत्तीमध्ये त्या शेतकऱ्याचे नुकसान होते. हे नुकसान भरून न येणारे असते, शेतकऱ्यांची अशी अवस्था पहिलीची मनाला वेदना होतात, त्यामुळे इंदापूर तालुक्यातील ज्या शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे ते ज्या घरांची पडझड झाली आहे त्यांना नक्की शासनाकडून मदत मिळेल अशीही माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे दुचाकीवर-
नुकसानग्रस्त शेती पिकाची पाहणी करण्यासाठी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर दत्तात्रेय भरणे अधिकाऱ्यांचा लवाजमा घेऊन दुचाकीवर पोहोचले.शेतीच्या बांधावरच पंचनाम्याचे आदेशही दिले.त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा धीर मिळाला आहे.मंत्री असतानाही कोणताही ढोल कोणत्याही ढोल मोल न करता,शेतकऱ्यांना मदत व्हावी या दृष्टिकोनातून भरणे यांचा पाहणी दौरा केल्यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.