मध्य प्रदेशमधील सध्याच्या राजकीय घडामोडींनंतर तेथे सत्तेवर असलेल्या कॉंग्रेस पक्षाला आणि त्यांच्या संघटनेला आगामी काळात सावध होण्याचा इशारा मिळाला आहे हे निश्चित. मध्य प्रदेशमधील कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी कॉंग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्या राज्यातील राजकारणाला वेगळी दिशा मिळणार आहे हेही निश्चित; पण अशा सगळ्या घटना घडत असताना सव्वाशे वर्षांपेक्षा जास्त इतिहास असलेल्या कॉंग्रेस पक्षाची संघटना जागी होणार आहे का, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे.
ज्योतिरादित्य शिंदे यांनी कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र पाठवून आपल्या भावना कळवल्यानंतर कॉंग्रेस संघटनेने त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने ज्योतिरादित्य शिंदे यांना पक्षातून काढून टाकण्यात आल्याचा निर्णय जाहीर केला. गेल्या काही दिवसांपासून अशा प्रकारच्या घडामोडी घडतील अशी कुणकुण लागली असूनही कॉंग्रेस संघटना जागी झाली नाही आणि ज्योतिरादित्य शिंदे यांच्याशी संवाद साधण्याचा कोणताही प्रयत्न केला गेला नाही हे दुर्दैवच म्हणावे लागेल. काही वर्षांपूर्वी ज्योतिरादित्य शिंदे यांचे पिताश्री माधवराव शिंदे यांच्या बाबतीतही असाच प्रकार घडला होता. तेव्हा माधवराव शिंदे यांनी मध्य प्रदेश पुरता एका प्रादेशिक पक्षाची स्थापना केली होती. नंतरच्या काळात माधवराव शिंदे पुन्हा जरी कॉंग्रेसमध्ये दाखल झाले असले तरी त्यांची नाराजी कायमच होती.
माधवराव शिंदे यांच्या दुर्दैवी निधनानंतर ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडेच त्यांचा वारसा होता अशा परिस्थितीत ज्योतिरादित्य शिंदे यांना सांभाळणे हे कॉंग्रेसची मोठी जबाबदारी होती; पण दुर्दैवाने काही ठराविक लोकांच्या चौकडीमध्ये अडकलेल्या कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांना तरुण नेत्यांच्या भावना समजून घेता येत नाहीत. हेच ज्योतिरादित्य शिंदे यांच्या प्रकरणानंतर सिद्ध झाले आहे. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या जवळच्या नेत्यांमध्ये ज्योतिरादित्य शिंदे यांचा समावेश होतो. गेल्या वर्षी झालेल्या मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीनंतर पंधरा वर्षे सत्तेवर असलेल्या भाजपाला बाजूला करून कॉंग्रेसला सत्ता स्थापन करण्याची संधी मिळाली तेव्हा ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासारख्या तरुण नेत्याच्या हातात सत्ता दिली असती तर आज ही वेळ आली नसती; पण तेव्हा कॉंग्रेस नेत्यांनी कमलनाथ यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यावर विश्वास दाखवला आणि ज्योतिरादित्य शिंदे आणि त्यांच्या समर्थकांची नाराजी ओढवून घेतली. त्याच काळात झालेल्या राजस्थान विधानसभा निवडणुकीनंतरही त्या राज्यातही असाच प्रकार घडला होता.
सचिन पायलटसारख्या तरुण तडफदार नेत्याला बाजूला सोडून अशोक गेहलोत यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याकडे मुख्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली होती. महाराष्ट्र राज्यातही राजीव गांधी यांचे जवळचे असलेले मिलिंद देवराही याच कारणामुळे नाराज होते. ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये कॉंग्रेस पक्षात प्रवेश केलेली अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिलासुद्धा कॉंग्रेस संघटनेमधील दुहीचा आणि चौकडीच्या राजकारणाचा फटका बसला आणि तीही आता कॉंग्रेस पक्षापासून बाजूला आहे. अशा प्रकारे अनेक तरुण नेते ज्यांच्यावर पक्षाची जबाबदारी देणे शक्य आहे, असे नेते जर बाजूला जात असतील तर कॉंग्रेस पक्ष संघटनेने आताच सावध होण्याची गरज आहे. मुळात गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी हेसुद्धा राजकारणातून थोडे अलिप्त झाल्यासारखे वाटतात.
गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर कॉंग्रेस पक्षाची पुनर्रचना करण्याची गरज निर्माण झाली तेव्हा राहुल गांधी यांनी आपण अध्यक्षपद स्वीकारणार नाही अशी भूमिका घेतली होती. तेव्हा कॉंग्रेस पक्षाने पुन्हा एकदा हंगामी अध्यक्ष म्हणून सोनिया गांधी यांच्यावर जबाबदारी दिली. खरे तर तेव्हा कॉंग्रेसने ज्योतिरादित्य शिंदे, सचिन पायलट, मुरली देवरा, राजीव सातव अशा तत्सम तरुण नेत्यांवर जर जबाबदारी टाकली असती तरी कॉंग्रेस संघटनेला चांगला चेहरा मिळाला असता आणि संघटनेला पुनर्जीवन मिळाले असते; पण दुर्दैवाने गांधी घराणे आणि ठराविक सल्लागारांची चौकडी यांच्या राजकारणाच्या बाहेर पडण्याची कॉंग्रेस पक्षाची तयारी नाही. त्याचा फटका आता मध्य प्रदेशमधील राजकारणाला बसला असून ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासारखा आश्वासक चेहरा कॉंग्रेस पक्षापासून बाजूला गेला आहे. भाजपसारख्या आक्रमक पक्षाचे आव्हान पेलायचे असेल तर कॉंग्रेस पक्षाला आपल्या संघटनेबाबत आता गांभीर्याने विचार करावा लागणार आहे. तीच तीच घराणी आणि तेच ते चेहरे या पक्षाला फार काळ पुढे नेऊ शकत नाहीत हे वास्तव समजून घेण्याची गरज आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर काही कारणाने राजकारणापासून अलिप्त राहिलेले राहुल गांधींनीही आता पक्षाची जबाबदारी घेण्याबाबत गांभीर्याने विचार करायला हवा. “सावध ऐका पुढल्या हाका’ या म्हणीप्रमाणे आगामी काळातील घडामोडी काय असू शकतील यावर नजर ठेवूनच कॉंग्रेस पक्षाला आता हालचाली कराव्या लागतील. मध्य प्रदेशनंतर राजस्थान आणि महाराष्ट्र या राज्यांवर भाजपची नजर असल्याच्या बातम्या येत आहेत. त्या केवळ बातम्याच असतील म्हणून त्याकडे दुर्लक्ष करूनही चालणार नाही. मध्य प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्र या महत्त्वाच्या राज्यांमधील सत्ता गमावल्यामुळे भाजप दुखावला गेला आहे आणि कोणत्याही परिस्थितीत या राज्यातील सत्ता पुन्हा मिळवण्याची त्यांची ईर्ष्या कायम आहे.
भाजपाच्या या अशा ईर्ष्यायुक्त राजकारणाला उत्तर द्यायचे असेल तर कॉंग्रेसला जुनेच विचार आणि जुने चेहरे कवटाळून चालणार नाही. मध्य प्रदेशमधील राजकीय घडामोडींनी दिलेला इशारा लक्षात घेऊन कॉंग्रेसने आताच सावध होण्याची वेळ आली आहे. गेल्या काही वर्षांत कॉंग्रेसने देशातील अनेक राज्यांमधील सत्ता गमावली होती. सुदैवाने गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर कॉंग्रेसला मध्य प्रदेश, राजस्थान आणि कर्नाटकची सत्ता मिळाली होती; पण आता ही सत्ता टिकवणे अवघड आहे हाच इशारा मिळाला आहे. कर्नाटक तर गमावले आहेच, मध्य प्रदेशही जाण्याच्या बेतात आहे.
कॉंग्रेस संघटनेतील गटबाजी लवकरात लवकर संपली नाही तर निवडणुकीच्या राजकारणात कमावलेले यश प्रभावी संघटनेच्या अभावी वाहून जाण्याचा धोका आहे. जुन्याच पद्धतीने पक्ष चालवण्याचा अट्टहास सोडून आधुनिक राजकारण करण्याची हीच वेळ आहे, हे मध्यप्रदेश राजकारणाने दाखवून दिले आहे.