- तिन्ही पक्षांत योग्य समन्वय,
- मुख्यमंत्र्यांचे कार्य उत्तम
मुंबई : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे सर्वांना सोबत घेऊन चालले आहेत. त्यामुळे मध्यप्रदेशात झाला तसा राजकीय भूकंप महाराष्ट्रात होणार नाही. महाराष्ट्रातील स्थिती उत्तम आहे. महाराष्ट्रात मध्यप्रदेशसारखी स्थिती ओढवणार नाही, हे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा ठाम विश्वास व्यक्त करतानाच शिमगा संपला ना आता? असा खोचक टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाडव्याआधी सरकार पाडण्याच्या वल्गणा करणाऱ्या भाजपला लगावला.
कॉंग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह 22 आमदारांच्या राजीनाम्यामुळे मध्यप्रदेशातील कमलनाथ सरकार अल्पमतात आल्याने महाराष्ट्रातही भाजपचं “ऑपरेशन लोटस’ सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बुधवारी शरद पवार यांनी विधानभवनातील पत्रकार कक्षात पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी मध्यप्रदेशमध्ये सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नांना पवार यांनी बिनधास्तपणे उत्तरे दिली.
महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस यशस्वी होणार नाही, असे ठामपणे सांगतानाच महाराष्ट्राची जितकी मला माहिती आहे ते पाहता महाविकास आघाडी सरकारला किंचीतही भिती नाही. राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार अतिशय उत्तम काम करीत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सगळ्यांना सोबत घेउन चालले आहेत. आघाडीतील तीनही पक्षात योग्य समन्वय आहे. राज्य सरकारच्या 100 दिवसांच्या कारकिर्दीला आपण 100 टक्के गुण देऊ.
ज्योतिरादित्य शिंदे हे चांगले युवा नेतृत्व आहे. पण त्यांच्या पक्षात नेमके काय झाले हे मला ठाऊक नाही. पण कॉंग्रेस पक्षात निवडणूक हरलेल्या नेत्याला लगेच वेगळी जबाबदारी दिली जाते असे होत नाही. तरीही कदाचित शिंदेंना पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद दिले असते तर आजची परिस्थिती वेगळी असती. पण कमलनाथ यांना मी ओळखतो, त्यांच्या नेतृत्वावर माझा भरोसा आहे. राजकीय चमत्कार करण्याची त्यांची क्षमता आहे. अजूनही मध्यप्रदेशातील सरकार कोसळलेले नाही. त्यामुळे वाट पाहू या, असे पवार म्हणाले.
येस बॅंक घोटाळ्याच्या जबाबदारीपासून केंद्रीय अर्थखाते तसेच बॅंकिंग व्यवहार खात्याला पळ काढता येणार नाही. हा घोटाळा काही एका दिवसात झालेला नाही, असे मत पवार यांनी व्यक्त केले. तसेच केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला योग्य प्रकारे अर्थसहाय होत नाही. ज्या प्रमाणात आपल्याकडून केंद्राला कर जातो त्या प्रमाणात अर्थसहाय होत नाही. टप्प्या-टप्प्याने आपल्याला सहाय करण्याची केंद्राची इच्छा असल्याचे आपल्याला समजते. पण राज्यांना योग्य प्रमाणात निधी देण्याची जबाबदारी केंद्राला टाळता येणार नाही. त्याचे दुष्परिणाम होउ शकतात, असेही ते म्हणाले.
मुस्लिम आरक्षणावर ठाम
मुस्लिम आरक्षणाबाबत अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी जी भूमिका मांडली ती योग्यच आहे. मुस्लिम आरक्षणावर आमचा पक्ष ठाम आहे. पण अद्याप हा विषय राज्य सरकारसमोर चर्चेला आले नसल्याचेही पवारांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले. तसेच मनसेच्या “शॅडो कॅबिनेट’ या संकल्पनेबाबत विचारले असता, शॅडो कॅबिनेट ही चांगली गोष्ट आहे. सरकारवर लक्ष ठेवण्यासाठी अशी यंत्रणा असणे चांगले असते. आपण काहीतरी केले पाहिजे. ते लोकांसमोर गेले पाहिजे यासाठी हे चांगले असल्याचे पवार म्हणाले.