– माधव विद्वांस
“गंधर्व नाटक मंडळी’ची स्थापना करणारे गणपतराव बोडस मराठी रंगभूमीवरील एक श्रेष्ठ गायक, नट म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचा जन्म 2 जुलै 1880 रोजी शेवगाव (जि. अहमदनगर) येथे झाला. त्यांचे संपूर्ण नाव गणेश गोविंद बोडस असले तरी गणपतराव याच नावाने ते ओळखले जात होते. त्यांचे वडील गोविंद विनायक बोडस, हेही गावातील पौराणिक नाटकांत कामे करीत असत. त्यामुळे अभिनयाचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळाले.
गणपतरावांचे शिक्षण पुणे येथे मराठी सहा व इंग्रजी दोन इयत्तापर्यंत झाले. त्यांच्या आईचे नाव सगुणाबाई व पत्नीचे अन्नपूर्णाबाई होते. शाळेत शिकत असताना ते हौशी नाट्यमंडळातून काम करू लागले. तेव्हा सुरू झालेल्या सार्वजनिक गणेशोत्सवात गायन, वादन, कीर्तन नाटकेही सुरू झाली व अनेक नवोदित कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधीही मिळाली. गणपतरावांनी शाळेतील समारंभाबरोबर येथेही अभिनय करण्यास सुरुवात केली.
वयाच्या 15 व्या वर्षी गणपतरावांनी वर्ष 1895 मध्ये “किर्लोस्कर संगीत मंडळी’त प्रवेश केला. तेथे त्यांना पहिली काही वर्षे दुय्यम भूमिका विशेषतः स्त्रीभूमिका मिळाल्या, पण हळूहळू त्यांना सौभद्र नाटकात कृष्ण, शारदा नाटकात कांचनभट, मूकनायकात विक्रांत व मानापमानात लक्ष्मीधर अशा महत्त्वाच्या भूमिका मिळत गेल्या. त्यांनी वर्ष 1913 मध्ये
किर्लोस्कर मंडळी सोडली. त्यानंतर बालगंधर्व व गोविंद सदाशिव टेंबे यांच्या सहकार्याने “गंधर्व नाटक मंडळी’ची स्थापना केली. या नाटक कंपनीने सौभद्र, मृच्छकटिका, मानापमान, विद्याहरण इ. नाटकांव्यतिरिक्त संशयकल्लोळ, स्वयंवर, एकच प्याला, द्रौपदी इ. दर्जेदार नाटकेही रंगभूमीवर आणली.
सुधाकर (एकच प्याला), लक्ष्मीधर (मानापमान), शकार (मृच्छकटिका), शिष्यवर (विद्याहरण) आणि फाल्गुनराव (संशयकल्लोळ) या गणपतरावांच्या भूमिका विशेष गाजल्या. 1930 सालानंतर मराठी रंगभूमीस उतरती कळा लागली व त्यानंतर अल्पावधीतच गणपतराव नाट्यव्यवसायातून निवृत्त झाले. त्यांनी करायचे ते चांगलेच, उठावदार व भूमिकेशी समरस होऊन करायचे या भावनेतून संगीत रंगभूमीची सेवा केली. तसेच कथानकातील अनेक व्यक्तिचित्रे अजरामर केली. गाणारा गळा नसतानाही कृष्णाच्या पदांना “वन्समोअर’ मिळवले. पुढे त्यांनी एक-दोन चित्रपटात भूमिका केल्या, परंतु चित्रपटसृष्टीत त्यांचे मन रमले नाही. नंतरच्या काळात त्यांनी प्रामुख्याने होतकरू नटांना मार्गदर्शन करण्याचेच काम केले.
वर्ष 1940 मध्ये नाशिक येथे भरलेल्या एकतिसाव्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. तसेच 1956 साली नांदेड येथे भरलेल्या मराठवाडा नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. वर्ष 1956 मध्ये त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते दिल्ली येथे संगीत नाट्य अकादमीचा पुरस्कार देण्यात आला. गणपतरावांनी सुमारे चाळीस वर्षे मराठी रंगभूमी गाजविली व अनेक बहुमान प्राप्त करून घेतले.
“माझी भूमिका’ हे त्यांचे आत्मचरित्र 1940 साली प्रथमतः प्रकाशित झाले व त्याची सुधारलेली आवृत्ती 1964 मध्ये काढण्यात आली. मराठी नाट्य अभिनेत्याने लिहिलेले हे पहिलेच आत्मचरित्र आहे. मराठी रंगभूमीच्या इतिहास व नवोदित कलाकारांसाठी हे आत्मचरित्र मार्गदर्शक आहे. 23 डिसेंबर 1965 रोजी पुणे येथे त्यांचे निधन झाले.