कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची लंडनमधील एका कार्यक्रमात नुकतीच एक प्रकट मुलाखत झाली. त्या प्रदीर्घ मुलाखतीत त्यांनी विविध विषयांवर आपली मनमोकळी मते व्यक्त केली आहेत. भाषण करताना त्यांच्यात इतका मोकळेपणा जाणवत नाही, पण मुलाखतीसारख्या कार्यक्रमात ते बऱ्यापैकी खुलले असतात. मुख्य म्हणजे कोणत्याही प्रश्नांना खुलेपणाने उत्तर देण्याची त्यांची तयारी असते. या मुलाखतीत त्यांनी मोदी सरकारच्या कार्यशैलीवर जोरदार आक्षेप घेत आपल्या पक्षाची विविध विषयांवरची भूमिका नेमकेपणाने स्पष्ट केलेली दिसली. त्यामुळे राहुल गांधी यांची नेमकी राजकीय समज किती ही बाब समजून घेण्यासाठी त्यांची ही मुलाखत उपयुक्त ठरली आहे. त्यात त्यांनी केलेले केरोसीनचे विधान बरेच गाजले आहे.
राहुल गांधी यांनी त्या मुलाखतीत म्हटले आहे की, भारतीय जनता पक्षाच्या सरकारने देशात दुहीची बिजे पेरून ठिकठिकाणी केरोसीन पसरले आहे. त्याचा भडका उडण्यासाठी एक ठिणगी पुरेशी आहे. कॉंग्रेसच्या उदयपूर येथील संमेलनाच्या समोरापाच्या भाषणातही त्यांनी पूर्ण देशात लवकरच मोठी आग भडकण्याची शक्यता सूचित केली आहे. त्यांनी या पूर्वी व्यक्त केलेल्या काही शंका रास्त ठरल्या होत्या. त्यामुळे त्यांचे हे विधान गांभीर्याने घ्यावे लागते. सध्या देशात भारतीय जनता पक्ष पुरस्कृत जे विविध वादांचे मुद्दे उपस्थित केले जात आहेत, त्यातून सरकारला आपल्यावर केल्या जाणाऱ्या टीकेवरील लक्ष अन्यत्र वळवण्याची संधी मिळत असेलही; पण त्यातून समाजात जी अस्वस्थता निर्माण होते आहे ती देशाच्या भवितव्यासाठी धोकादायक आहे, असे राहुल गांधी यांना सुचवायचे असावे.
केवळ धार्मिक द्वेषाच्या दुहीमुळेच हे असे घडेल असे नव्हे, तर देशात वाढलेली कमालीची महागाई, बेरोजगारी आणि खालावलेल्या अर्थकारणामुळे अस्वस्थ झालेले समाजमन कधी ना कधी उफाळून बाहेर येईल, असेही त्यांना सुचवायचे असेल. समाजात निर्माण होणाऱ्या प्रतिक्रियांना मोकळेपणाने वाट करून दिली पाहिजे अन्यथा त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, तर काही दिवसांनी प्रेशर कुकर सारखी स्थिती निर्माण होते आणि या कुकरमध्ये निर्माण झालेल्या वाफेच्या शक्तीचा विस्फोट होतो. त्यामुळे ही वाफ साठवून राहण्याची प्रक्रिया रोखण्याचा प्रयत्न करणे आणि लोकांना मोकळ्या स्वरूपात आपल्या भावना किंवा म्हणणे मांडू देणे याला खूप महत्त्व आहे. आज देशात मूळ प्रश्न सोडून वारंवार गैरलागू प्रश्नांकडेच लोकांचे लक्ष विचलित होत असल्याने जे समाजमन कोंडले गेले आहे त्याचा कधी ना कधी विस्फोट होण्याची शक्यता आहे, असे राहुल गांधी यांचे विवेचन असते. त्यातूनच त्यांनी हे सरकारकडून देशभर केरोसीन पेरले गेल्याचे विधान केले आहे.
भारतीय जनता पक्षाने त्यांच्या विधानाचा समाचार घेण्यासाठी गौरव भाटियांची नियुक्ती केली होती. भाटिया यांनी राहुल गांधी यांच्यावर विदेशी भूमीवरून भारताचा अवमान केल्याची टीका त्यांच्यावर केली; पण ती काही फारशी परिणामकारक ठरली नाही. सरकारच्या चुकीच्या धोरणांवर बोलणे हा देशद्रोह किंवा देशाचा अवमान नसतो हे आता बहुतेकांच्या लक्षात आले आहे. राहुल गांधींच्या एखाद्या बाबीची चुकीच्या पद्धतीने मांडणी केली गेली, तर सोशल मीडियावर ते लगेच ट्रोल होतात. पण लंडन येथील या मुलाखतीत त्यांनी व्यक्त केलेल्या मतांवर त्यांच्या विरोधात फार ट्रोलिंग झालेले दिसले नाही. या मुलाखतीत राहुल गांधींना आंतरराष्ट्रीय विषयावर विशेषत: रशिया-युक्रेन युद्ध आणि भारतीयांची भूमिका यावरूनही प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी त्यांनी रशियाने युक्रेनमध्ये बजावलेली आक्रमकपणाची भूमिका आणि चीनने भारतातील लडाखमध्ये आणि अरुणाचल प्रदेशात केलेली घुसखोरी याची तुलना केली.
ते म्हणाले की, ही दोन्ही ठिकाणची स्थिती जवळपास एकसमानच आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाचा त्यांनी नि:संदिग्धपणे विरोध नोंदवला. भारत सरकारने मात्र अजून त्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. रशियाने युक्रेनच्या भूभागावर दावा सांगण्यासाठी तसेच युक्रेनने नाटोशी दाखवलेल्या संलग्नतेला विरोध करण्यासाठी म्हणून हा हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे, नेमकी तशीच भूमिका चीनने भारताच्या बाबतीत घेतली आहे. त्यांनीही लडाख आणि अरुणाचलच्या काही भागांवर आपला दावा सांगत तेथे आक्रमण केले आहे आणि भारताचे अमेरिकेबरोबर जे संबंध आहेत त्याला त्यांनी विरोध केला आहे. ही कारणमीमांसा करीत चीनने भारतीय हद्दीत व्यवस्थित आक्रमण केल्याची बाबही राहुल गांधी यांनी या मुलाखतीत निदर्शनाला आणून दिली आहे. त्यांचे हे विवेचन गैरलागू नाही. कॉंग्रेसच्या सध्याच्या अवस्थेविषयीही त्यांनी येथे आपली भूमिका व्यवस्थितपणे मांडली आहे.
भारतातील सरकारने देशापुढे एक मोठे आव्हान निर्माण केले आहे. त्या आव्हानांचा समर्थपणे सामना करणे ही आमच्यासाठी एक संधी आहे आणि त्यासाठी आम्ही संघर्ष करीत आहोत, या संघर्षातून नक्कीच काही तरी चांगले घडेल असा एक पॉझिटिव्ह विचारही त्यांनी मांडला आहे. राहुल गांधी यांना अपरिपक्व ठरवण्याची त्यांच्या विरोधकांमध्ये सध्या मोठीच स्पर्धा लागलेली दिसते आहे. पण जेव्हा केव्हा राहुल गांधी यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी मिळते त्यावेळी त्यांच्याकडून ज्या प्रकारचा युक्तिवाद केला जातो तो ऐकला की ते राजकीयदृष्ट्या अपरिपक्व आहेत, असे वाटत नाही. कोणतेही मुद्दे आणि भूमिका स्पष्टपणे मांडण्यास ते कचरत नाहीत, अवघड विषयांचा, प्रश्नांचाही ते यशस्वीपणे युक्तिवाद करीत राहतात. त्यातून समोरच्याचे पूर्ण समाधान होते की नाही हे कळण्यास मार्ग नसतो; पण त्यांच्या प्रतिपादनात उणेपणा दिसत नाही, हे मात्र खरे आहे.
भारतातील सभा, संवादातून त्यांना फार प्रसिद्धी मिळत नाही; पण विदेशी भूमीवरून त्यांचे जे कार्यक्रम होतात त्याला मात्र येथे बऱ्यापैकी प्रसिद्धी मिळताना दिसते आहे. राहुल गांधी यांच्याकडे देश चालवण्याची क्षमता आहे की नाही, यावर आजपर्यंत बराच काळ चर्चा होत राहिली आहे. त्यांना पराभवापाठोपाठ पराभव स्वीकारावे लागले आहेत. पक्ष रोजच रिकामा होत असताना दिसत आहे. खरे पाहता त्यांच्यासाठी ही पूर्ण हताश स्थिती आहे. या स्थितीचा सामनाही ते ज्या धैर्याने करीत आहेत तेही महत्त्वाचे आहे.