“साहित्य किंवा इतर कलांमधले नवे दर्शन सदैव डोळ्यांना उथळ सुख देणारेच असते असे नाही. बहुधा ते नसतेच. कधी कधी ते पीडादायकही होते. साधी शाळेला जायला निघालेली मुलगीदेखील एकेकाळी संस्कृतीची भांग चढलेल्या डोळ्यांना पीडादायक झाली होती. ही पीडा होणेही अस्वाभाविक नाही. परंतु त्या नव्या दृश्यातून घडणाऱ्या मानवी जीवनातल्या एखाद्या अप्रकाशित पैलूचे दर्शन समाजाच्या दृष्टीने मोलाचे मानले पाहिजे.
सर्वसामान्य लोक ही पीडा कलेच्या संदर्भात सहन करायला सहजा सहजी राजी होत नाहीत. कारण त्यांच्या लेखी कलांचा आस्वाद हा तापल्या जीवाला थंडगार सरबताप्रमाणे घ्यायचा असतो ऐवढेच असते! म्हणून रुळल्या वाटा सोडून जाणारांमागे लोक जात नाहीत. नाटकासारख्या, इतर कलांच्या मानाने अधिक खर्चाच्या कलाप्रयोगाला मूळ धरणेच अशक्य होते. केवळ प्रचंड गर्दीचा पाठिंबा नाही म्हणून हे प्रयोग मुळातच आर्थिकदृष्ट्या अशक्त करून टाकणे म्हणजे विकासाची मुळीच उपटून टाकण्यासारखे आहे.
आज सुदैवाने महाराष्ट्रात ह्या नव्या प्रयोगाविषयी जोराचे विचारमंथन चालले आहे. मला ह्या प्रसंगांना लाभणाऱ्या थोड्याफार सहानुभूतीइतकाच विरोधही मोलाचा वाटतो. कारण त्यातून “नाटक’ नावाच्या कलाप्रकाराविषयींची आस्था आढळून येते. नाटकाला एक कलाप्रकार म्हणून फार मोठी मान्यता देणारा समाजच आपली आवड आणि नावड जोरदार रितीने व्यक्त करतो. परंतु नवे प्रयोग खर्चाच्या ओझ्याखाली चुकीच्या औचित्यविचाराखाली दबले जाऊन केवळ लोकांचे रंजन करणारेच नाट्यप्रयोग चालू राहावेत असे म्हणणे योग्य नाही.
मनोरंजनाला मी कधीही गौण मानत नाही. त्यालाही कसब लागते. परंतु नाटकाने केवळ कसबांतून मिळणाऱ्या मनोरंजनावरच समाजाला गुंगवीत ठेवणे बरोबर नाही. म्हणून जिथे आर्थिक बोजा फारसा नसेल अशा छोट्या नाट्यगृहाची व्यावसायिक रंगभूमीच्या विकासाच्या दृष्टीनेही आवश्यकता आहे.’
विनोद हा काहीशा अतिरेकातून व एकांगी दर्शनातून निर्माण होतो म्हणतात. पण तशा ख्यातनाम विनोदकाराने वरच्यासारखे समतोल, काटेकोर मतप्रदर्शन करावे हाही एक विनोदच नव्हे काय? पु. ल. देशपांडे यांचे व्यक्तिमत्त्व बहुरंगी आहे. कारण सखाराम बाईंडरची पाठराखण करून बसलेले पु. ल. देशपांडे यांच्या एका ताज्या पत्रातला वर दिलेला मजकूर हे एक नमुनेदार कात्रण आहे!