-माधव विद्वांस
भारतीय सर्कसचे जनक विष्णुपंत छत्रे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील अंकलखोप येथे सन 1840 मध्ये झाला. त्यांच्या जन्माची नक्की तारीख उपलब्ध नाही. ते शिक्षणात फारसे रमले नाहीत. त्यांना बालपणापासून पशुपक्ष्यांशी खेळण्याची आवड होती. कुत्री, माकडे, ससे, कबुतरे यांच्यात ते रमून जात. तसेच त्यांना गायनाचीही आवड होती आणि गायन शिकण्याची इच्छा होती.
शिकण्यासाठी पैशाची सोय व्हावी म्हणून त्यांनी रामदुर्गकरांकडे घोड्याच्या पागेवर नोकरी पत्करली. थोडेफार पैसे कमावल्यावर ग्वाल्हेरला जाऊन बाबासाहेब आपटे यांच्या आश्रयास राहून गायनाचे शिक्षण घेतले. ग्वाल्हेर संस्थानात आपटे हे घोडी शिकवून तयार करण्याच्या कामावर होते, तर नावाजलेले गायक हद्दुखॉं तेथेच दरबारी होते. आपट्यांकडे अश्वशाळा व हद्दुखॉं यांचेकडे ते गायन शिकू लागले.
ग्वाल्हेर येथे 8 ते 10 वर्षांच्या या कालावधीत घोड्यांच्या कसरतीत त्यांनी अथक मेहनत घेऊन प्रावीण्य मिळवले आणि महाराष्ट्रात परतले. ते इंदूर, विंचूर, कुरुंदवाड, जव्हार अशा अनेक संस्थानांत घोड्यांना चाल आणि कवायतीचे शिक्षण देऊ लागले. त्यांना आर्थिक सुबत्ताही आली. अनेक संस्थानिकांकडे ते अश्वशाळेचे सल्लागार बनले. एकदा मुंबई प्रांताचे तेव्हाचे गव्हर्नर फर्गसन हे कुरुंदवाडकरांकडे आले होते. त्यांच्यासमोर विष्णुपंतांनी घोड्यांच्या कसरती सादर केल्या.
जेमतेम 10 मिनिटे वेळ देण्यात आली होती; पण गव्हर्नर फर्गसन 45 मिनिटे हा शो बघत राहिले. विष्णुपंतांचे त्यांनी भरभरून कौतुक केले. या सुमारास चर्नी विल्सन या इंग्रज व्यक्तीची “हर्मिस्टन सर्कस’ मुंबई येथे सुरू होती, ही सर्कस बघण्यास कुरूंदवाडचे संस्थानिक सहकुटुंब मुंबईस आले होते. त्यांच्या समवेत अश्वविद्येत पारंगत विष्णुपंत छत्रे देखील होते. सर्कशीतील चर्नी विल्सनने केलेल्या घोड्यांवरील कसरती बघून सारेच अचंबित झाले.
सर्कसचा शो संपल्यावर विष्णुपंतांनी त्यांची गाठ घेतली. यावेळी चर्नी विल्सन म्हणाले की, “घोड्यांवरील अशा कसरती कुणाही भारतीयाला करता येणे शक्य नाही.’ हे ऐकताच विष्णुपंत डिवचले गेले. अवघ्या पाच-सहा महिन्यांतच जमवाजमव करून त्यांनी मुंबईत क्रॉस मैदान येथे तंबू उभारून “ग्रॅंड इंडियन सर्कस’ सुरू केली. या सर्कसमधील 2 सिंह, भारतमाता उभी असणारा रथ ओढत आणताच प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाटात व्हायचा.
स्वतः विष्पुपंत घोड्यांवरील कसरती करीत असत. हळूहळू विष्णुपंत यांची सर्कस तुफान चालू लागली त्यामुळे चर्ली विल्सनच्या सर्कसवर परिणाम झाला व ती बंद पडली. बंद पडलेली सर्कस त्यांनी आपल्या सर्कसमध्ये सामावून घेतली. 26 नोव्हेंबर 1882 रोजी विष्णुपंत यांच्या पहिल्या सर्कसचा शो झाला व भारतीय सर्कसचा जन्म झाला.
साधारण ऐंशीच्या दशकापर्यंत भारतात सर्कसचे शो अबालवृद्धांचे आकर्षण होते. पण प्राण्यांचा सहभाग बंद झाला व सर्वच भारतीय या धाडसी खेळास मुकले. गावात सर्कस आली की उत्साहाचे वातावरण असे. कालांतराने त्यांनी सर्कसची सारी धुरा त्यांचे बंधू काशिनाथपंत यांच्याकडे सोपवली व ते त्यांचे गायकीतील गुरूबंधू रहिमतखॉंसाहेब यांच्याबरोबर देशाटनास निघून गेले व इंदूर येथे स्थायिक झाले. मधुमेहाच्या आजाराने इंदूर येथे 20 फेब्रुवारी 1905 रोजी त्यांचे निधन झाले.